चला पंढरीसी जाऊं। रखमादेवीवरा पाहूं।।
डोळे निवतील कान।
मना तेथे समाधान।।
संता महंता होतील भेटी । आनंदे नाचो वाळवंटी।।
ते तीर्थांचे माहेर।
सर्व सुखाचे भांडार।।
जन्म नाही रे आणीक। तुका म्हणे माझी भाक।।
जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाप्रमाणे राज्यासह परराज्यातील भाविक वारकरी आषाढी वारीला विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला येतात. एका दिवसात वाहनाने न जाता लाखो लोक हे संतांचे पालखी सोहळ्यासोबत येतात. संत ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरू तुकोबाराय, संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव, संत मुक्ताई, शांतीबह्म संत एकनाथ महाराज, संत नामदेव आदी संतांचे पालखी सोहळ्यात सहभागी होऊन वारकरी पंढरीला येतात. संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा लष्करी शिस्तीचा आहे. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे हा सोहळा एका सरदारांनी अर्थात माऊलींचे निस्सीम भक्त हैबतबाबा आरफळकर यांनी सुरू केला असून सोहळ्याला शितोळे सरकार यांचा राजाश्रय लाभलेला आहे.
माऊलींच्या आषाढी वारी सोहळ्यात बेळगाव जिल्ह्यातील चिकोडीमधील अंकली या गावातील शितोळे सरकार यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. ऊर्जितसिंहराजे शितोळे सरकार आणि त्यांचे चिरंजीव महादजी शितोळे सरकार (अंकलीकर) हे दोघे सध्या वारी काळात महत्त्वाची भूमिका साकारत आहेत. माऊलींच्या दोन्ही अश्वांचा मान शितोळे सरकार यांच्याकडे तर आहेच; पण त्याचबरोबर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांना राजाश्रय देण्याचे कार्य शितोळे सरकारांनी पालखी सोहळा सुरू झाला तेव्हापासून केले आहे. हैबतबाबांनी माऊलींचा पालखी सोहळा आषाढी वारीसाठी पंढरपूरला नेण्याची प्रथा सुरू केली. तीच परंपरा पुढे शितोळे सरकारांनी राजाश्रयासह अव्याहत सुरू ठेवली आहे.
हैबतबाबा आरफळकर यांच्याकडे ग्वाल्हेर घराण्याची सरदारकी होती. एकदा त्यांना माउलींच्या भक्तीची प्रचिती आली त्यानंतर ते माऊली चरणी लीन होऊन आळंदी येथे राहत असत. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांचा एकत्रित पालखी सोहळा तत्कालीन काही कारणांमुळे विभागला गेल्यानंतर त्यांनी माऊलींचा स्वतंत्र पालखी सोहळा नेण्याची प्रथा सुरू केली. त्यावेळी शितोळे सरकार यांनी राजाश्रय देऊन पालखी सोहळ्यासाठी लागणारे साहित्य, लवजमा दिला. आजही ही परंपरा सुरू असून पालखी सोहळ्यातील अश्व, माऊलींचा तंबू शितोळे सरकार यांचा असतो. तसेच सोहळ्यादरम्यान होणाऱ्या बैठका, महत्वाचे निर्णय हे शितोळे सरकार यांच्या पालाजवळ होत असतात. 1832 पासून ही परंपरा अंकलीचे शितोळे सरकार जपत आहेत.
वारी काळात माऊलींचा विसावा शितोळे सरकारांच्या तंबूमध्येच असतो. याबरोबरच सकाळचा मानाचा नैवेद्यही शितोळे सरकार यांच्याकडूनच जातो. वारी सुरू असताना वारकऱ्यांमध्ये अथवा दिंड्यांमध्ये काही वाद झाले, भांडणतंटा झाला किंवा काही अडचण असेल तर त्याच्या निवाड्यासाठी शितोळे सरकारांना सांगितले जाते. विषय अगदीच गंभीर असेल तरच शितोळे सरकारांच्या ध्वजाखाली जरीपटक्याच्या तंबूजवळ त्याचा अंतिम निर्णय होतो. म्हणजेच वारीकाळातील काही वाद असल्यास ते शितोळे सरकारांच्या ध्वजाखाली संपुष्टात आणण्यात येतात.
राजाश्रयामुळेच वाखरी ते पंढरपूर माऊलींच्या पादुका घेऊन चालायचा मानही शितोळे सरकार यांच्याकडे आहे. पाच दशकांहून अधिक काळ ऊर्जितसिंहराजे शितोळे सरकार माऊलींच्या पादुका घेऊन वाखरी ते पंढरपूर पायी चालतात. पालखी सोळा सुरु झाल्यावर शितोळे सरकारांच्या हस्ते पादुका पालखीत ठेवल्या जातात. पंढरपुरात आल्यावर आरती झाल्यावर त्यांच्या हातात पादुका दिल्या जातात आणि नंतर तिथून मंदिरापर्यंत शितोळे सरकार घेऊन येतात. पौर्णिमेच्या दिवशी काल्याच्या कीर्तनाने पंढरपुरातील वारी सोहळा समाप्त होतो, यावेळी टेम्पो किंवा वाहनातून अश्वांना घेऊन शितोळे सरकार यांचा वारीतील परतीचा प्रवास सुरू होतो.