मुंबई – मुंबई हायकोर्टाच्या एक सदस्य खंडपीठाने नवाब मलिक यांना वानखेडेंवर आरोप करण्यास सरसकट बंदी घालण्यास नकार दिला आहे. त्या निर्णयाला एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांचे वडिल ज्ञानदेव वानखेडे यांनी मुंबई हायकोर्टाच्या वरीष्ठ खंडपीठात आव्हान दिले आहे. आपण किंवा आपल्या कुटुंबियांच्या विरोधात नवाब मलिक यांनी कोणत्याही कॉमेंट्स करू नयेत किंवा कोणतेही आरोप करू नयेत अशी मागणी त्यांनी यात केली आहे.
या विषयाची त्वरीत सुनावणी घ्यावी अशी मागणीही ज्ञानदेव वानखेडे यांनी आपल्या याचिकेत केली आहे. त्यांची ही याचिका न्या. कथावाला आणि न्या मिलिंद जाधव यांच्या खंडपीठापुढे गुरूवारी सुनावणीला येण्याची शक्यता आहे. सोमवारी न्या माधव जमादार यांच्या एक सदस्य खंडपीठाने वानखेडे याचे अपिल फेटाळून लावताना नवाब मलिक यांच्या वक्तव्यांवर सरसकट बंदी घालता येणार नाही असे म्हटले होते.
समीर वानखेडे हे जन्माने मुस्लिम आहेत असा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. त्यासाठी समीर वानखेडे यांचा जन्माचा दाखला, निकाहनामा, तसेच स्कुल लिव्हींग सर्टिफिकेट अशी काही कागदपत्रे मलिक यांनी सादर करीत त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. समीर वानखेडे हे खंडणी वसुलीसाठीच मोठ्या लोकांवर खोट्या कारवाया करतात आणि त्यांनी आजपर्यंत या प्रकारातून किमान एक हजार कोटी रूपयांपेक्षा अधिकची वसुली केली आहे असाही आरोप नवाब मलिक यांनी केला होता.
आर्यन खानवर करण्यात आलेली कारवाईही खोटी होती त्यांना यात जाणिवपुर्वक फसवण्यात आल्याचा आरोप मलिक यांनी केला होता. त्यांचा हा आरोप हायकोर्टाच्या जामीनाच्या निकालपत्रात खरा असल्याचे दिसून आले आहे असाही दावा मलिक यांनी केला आहे.