आळंदी, (एम. डी. पाखरे/ ज्ञानेश्वर फड) – कार्तिकी एकादशी, आळंदी यात्रेनिमित्त भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी आज (बुधवार) संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिराची पाहणी केली. वाहतूक व्यवस्था, भाविकांसाठी दर्शनरांग व्यवस्थेची पाहणी केली.
कोरोना संसर्ग पूर्णपणे संपलेला नाही. निर्बंध शिथिल केलेले असले तरी पूर्णपणे हटवण्यात आलेले नाहीत. मंदिर परिसरात सोशल डिस्टनसिंगचे पालन होईल, कोरोनाच्या नियमांचे पालन होईल याकडे देवस्थान कमिटीने लक्ष द्यावे. दोन वर्षे यात्रा न भरल्याने यावर्षी मोठ्या संख्येने भाविक यात्रेला येण्याची शक्यता असल्याने अधिकचा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. भाविकांनी नियमांचे पालन करून सोहळा साजरा करावा, असे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी सांगितले.
यावेळी पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांसह पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 मंचक इप्पर, आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, दीघी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे, वहातूक विभागाचे पोलीस निरीक्षक जाधव, गुन्हे पोलीस निरीक्षक बाबर, आळंदी नगरपालिका मुख्य अधिकारी अंकुश जाधव, आळंदी देवस्थानचे मुख्य विश्वस्त योगेश देसाई, विश्वस्त ऍड विकास ढगे पाटील, विश्वस्त डॉ. अभय टिळक, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर उपस्थित होते.
-भाविकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना
कार्तिकी यात्रा काळात वारकऱ्यांची व अत्यावश्यक वाहने वगळता इतर वाहनांना प्रवेशबंदी असणार आहे. त्यासाठी आळंदीच्या चारही बाजूंच्या रोडवर नाकाबंदी करण्यात येणार असून वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भाविकांसाठी ठिकठिकाणी पोलीस मदत केंद्र, सीसीटीव्ही कॅमेरे, पब्लिक अनाऊसिंग सिस्टीम, सूचना बोर्ड लावण्यात येत आहेत. दहशतवादी कारवाई तसेच घातपात प्रतिबंधसाठी बॉम्बशोधक व नाशक पथकांना पाचारण करण्यात येणार आहे.
दरम्यान, 27 नोव्हेंबरला संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्याला सुरुवात होणार आहे. 30 नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी (आळंदी यात्रा) असून 2 डिसेंबरला माऊलींचा 725वा संजीवन समाधी सोहळा आहे.