रांजणी -राज्याचे कामगारमंत्री दिलीपराव वळसे पाटील व शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव अढळराव पाटील यांच्यातील राजकीय वैमनस्य जनतेला सर्वश्रुत आहे. मात्र, पदवीधर मतदार संघाच्या उमेदवारांच्या प्रचारानिमित्ताने आंबेगाव तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेचे कार्यकर्ते 16 वर्षानंतर प्रथमच एका व्यासपीठावर आले आणि त्यांच्यातील जवळीक पाहायला मिळाली.
महाविकास आघाडीच्या पदवीधर मतदार संघातील उमेदवार प्रसाद लाड आणि शिक्षक मतदार संघातील उमेदवार जयंत आसगांवकर यांच्या प्रचाराच्या निमित्ताने मंचर (ता. आंबेगाव) येथे मेळावा आयोजित करणेत आला होता. या मेळाव्याला राज्याचे कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील, अरुण गिरे, राजाराम बाणखेले, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष देवदत्त निकम, माजी आमदार पोपटराव गावड, विष्णु हिंगे, विवेक वळसे पाटील, मानसिंग पाचुंदकर, राजू इनामदार, प्रदीप वळसे पाटील आदी तीनही पक्षाचे नेते 16 वर्षानंतर प्रथमच एका व्यासपीठावर पाहायला मिळाले.
महाराष्ट्रात प्रथमच राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि शिवसेनेचे सरकार स्थापन झाले. या सरकारमध्ये दिलीपराव वळसे पाटील कॅबिनेट मंत्री झाले. सरकार स्थापन झाल्यापासून आजपर्यंत आंबेगाव तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची मने कधीही जुळून आलेली दिसत नव्हती.
अथवा कोणत्याही राजकीय कार्यक्रमानिमित्त नेते किंवा कार्यकर्ते एकत्र आलेले पाहावयास मिळाले नाहीण सोमवारी (दि. 23) मंचर येथे शिक्षक व पदवीधर संघाच्या निवडणूक प्रचारानिमित्त आयोजित केलेल्या मेळाव्यात मंत्री दिलीप वळसे पाटील, राजाराम बाणखेले, देवदत्त निकम, अरुण गिरे यांची जवळीक मेळाव्याला उपस्थित असणाऱ्या कार्यकर्त्यांना पाहावयास मिळाली.