नगर -करोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका असताना आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यास पालक बिलकुल तयार नाहीत. पालकांमध्ये प्रचंड असंतोष आणि भीतीचं वातावरण आहे. आरटीपीसीआर टेस्ट मध्ये राज्यातील 500 हून अधिक शिक्षक कोविड पॉझिटिव्ह निघाले आहेत. ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती पाहता मुंबईप्रमाणे महाराष्ट्रातील कोविड संसर्गाची शक्यता लक्षात घेता सर्व भागातील शाळा, कॉलेजेस बंद ठेवणं उचित ठरेल. असे पत्रच शिक्षक भारतीचे आमदार कपील पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना दिले असल्याची माहिती शिक्षक नेते तथा शिक्षक भारतीचे राज्य सचिव सुनिल गाडगे यांनी दिली.
शिक्षकांना वर्क फ्रॉम होमची ऑनलाइन शिक्षणासाठी मुभा देण्यात यावी. पहिल्या सत्रात माध्यमिक विभागात ऑनलाइन शिक्षण बऱ्यापैकी झाले असले तरी प्राथमिक विभागात ऑनलाइन शिक्षणाच्या मर्यादा स्पष्ट झालेल्या आहेत. किमान उर्वरित सत्रासाठी कृती पुस्तिका, वर्क बुक, वर्क शीट, ऍक्टिव्हिस्ट बुक छापून हे विद्यार्थ्यांपर्यंत पोचवल्यास ऑनलाइन शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळू शकेल. 10 वी, 12 वी च्या परिक्षांचा पॅटर्नही यावर्षासाठी बदलावा लागेल. त्याचा निर्णयही लवकर व्हावा.
व्हॅक्सिन येत नाही तोवर शाळा, कॉलेज सुरू करण्याची घाई करू नये. तसेच व्हॅक्सिन आल्यानंतर आरोग्य आणि पोलीस कर्मचारी यांच्या सोबतच विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर आणि अंगणवाडी ताई यांना प्राधान्याने व्हॅक्सिन मोफत उपलब्ध करून द्यावे, गाडगे यांनी म्हटले. यावेळी जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप, जिल्हा माध्यमिकचे सचिव विजय कराळे, कार्याध्यक्ष बाबासाहेब लोंढे, योगेश हराळे, जितेंद्र आरु, महेश पाडेकर, किशोर डोंगरे, संभाजी पवार, संतोष मगर, संजय तमनर, संतोष देशमुख, नवनाथ घोरपडे, गोरखनाथ गव्हाणे, हनुमंत रायकर, सुदाम दिघे, श्रीकांत गाडगे आदींच्या निवेदनावर सह्या आहेत.