विनोद पोळ
कवठे – राज्यातील सत्तास्थापनेचे नाट्य रंगत असताना मिनिटामिनिटाला होणाऱ्या बदलांमुळे कार्यकर्त्यांच्या मनाचा तराजू खालीवर होत होता. एकमेकांविरोधात लढलेल्या भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता राज्यात आली तर तालुक्याच्या राजकारणात काय काय बदल होतील, या विचारातच कार्यकर्ते गप्प राहून राजकारणाच्या घडामोडी पाहत होते. त्यामुळे सोशल मीडियावरही वाई तालुक्यातील कार्यकर्त्यांकडून बदलांच्या अनुषंगाने उलटसुलट चर्चा रंगत होती.
निवडणुका पार पडल्यापासून सरकार स्थापनेबाबत एवढे काही बदल घडत गेले की दररोज सर्वच पक्षाचे कार्यकर्ते ताज्या बातम्यांचे दिवाने झाले. आपल्या आयुष्यातील अनमोल वेळ सोशल मीडियाच्या ग्रुपवर खर्ची करू लागल. आपलाच पक्ष व आपलाच नेता कसा श्रेष्ठ, याबाबत कमेंटस करण्यात दंग होऊ लागले. सत्ता व सरकार स्थापनेच्या वेगवेगळ्या दाव्याप्रतिदाव्यांतून शालेय शिक्षणात नागरिकशास्त्र कच्चे होते, त्या कार्यकर्त्यांचे नागरिकशास्त्र या निवडणुकीपासून चांगलेच पक्के झाले.
वाई तालुक्यात तर सोशल मीडियावर दररोज काही तास व्यतित करणे ही बऱ्याच कार्यकर्त्यांची नित्याचीच बाब होऊन गेली होती. अशातच आज सकाळी अचानक सोशल मीडिया आणि चॅंनेलवर ब्रेकिंग बातम्या सुरु झाल्या आणि “मी पुन्हा येईन ,पुन्हा येईन, पुन्हा येईन,’ असे तीन वेळा म्हणता म्हणता देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी सकाळी पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याच्या बातम्या झळकू लागल्या. यामुळे वाई तालुक्यातील कार्यर्कर्त्यांच्यात सोशल मीडियावरील राजकीय वातावरण खूपच ढवळले गेले.
वाई विधानसभा मतदारसंघामध्ये पारंपारिक लढत झाली ती आमदार मकरंद पाटील व किसन वीर कारखान्याचे चेअरमन मदन भोसले यांच्यात. परंपरेने गतनिवडणुकीपर्यंत ही निवडणूक कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यामध्ये किंवा दोन्हीपैकी एक अपक्ष व दुसरा कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढवीत आल्याने विधानसभेच्या या मतदारसंघामध्ये आबा विरुद्ध दादा अशीच कार्यकर्त्यांची फळी निर्माण झाली आहे. मात्र, यंदा मदन भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला व ही निवडणूक भाजप- शिवसेना युती विरुद्ध राष्ट्रवादी- कॉंग्रेस पक्ष महाआघाडी यांच्यात झाली व यामध्ये कार्यकर्त्यांनी आपलाच पक्ष कसा श्रेष्ठ यासाठी सोशल मीडियावर प्रचाराची खैरात केली.
मात्र आज सकाळी बातम्या पाहताना भाजपचा मुख्यमंत्री व राष्ट्रवादीचा उपमुख्यमंत्री असे चित्र दिसू लागल्याने वाई मतदारसंघात मात्र कमालीची शांतता पसरली. त्याला कारणही तसेच निवडणुकीत जे कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात रान उठवत होते, त्यांना हा अनपेक्षित धक्का होता आणि मदनदादा विरुद्ध मकरंदआबा हे समीकरण यंदा भाजपविरुद्ध राष्ट्रवादी असे झाल्याने या दोघांच्या अनपेक्षित युतीने दुपारपर्यंत सोशल मीडियावर भाईचाऱ्याचे पोवाडे गायले जाऊ लागले.
पण तेही दबक्या आवाजात. वाई तालुक्यातील बहुतांश गावामध्ये सद्यस्थितीत राजकीय पटलावर भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेस हेच दोन गट एकमेकांचे प्रबळ विरोधक आहेत. त्यातच सरकार स्थापनेचा झालेला निर्णय व शपथविधीनंतर ही सर्व गावे राजकीय पटलावर पुढील सर्व निवडणुका एकत्र लढतील की काय, आगामी काळात असलेल्या जिल्हा बॅंक, किसन वीर कारखाना यांच्या निवडणुकांसोबतच सोसायटी, ग्रामपंचायत निवडणुका याबाबत चर्चा होऊ लागल्या.
पुन्हा दुपारी शरद पवार यांनी पुन्हा राजकीय नवी खेळी खेळल्याने आत्ता मात्र कार्यकर्त्यांची गोची झाली. एकमेकांच्या विरोधात लढलेल्या या पक्षांनी आता एकमेकांचे पोवाडे गायचे की उद्याच्या दिवसात काय बदल होताहेत, याकडे लक्ष ठेवायचे, हा आटापिटा करताना सामान्य कार्यकर्ता मात्र पुन्हा आपले नागरिकशास्त्र हरवून सुन्न झाल्याचे चित्र सध्या वाई मतदारसंघात आज जाणवत आहे.