गांधीनगर – गुजरात विधानसभेच्या ( Gujarat Assembly Elections ) दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान होते आहे. आतापर्यंत दुरंगी लढत होत असलेल्या या राज्यात यंदा प्रथमच तिरंगी लढत होणार आहे. भारतीय जनता पार्टी, कॉंग्रेस या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांसोबतच यंदा आम आदमी पक्षानेही जोरदार हवा केली आहे. आपचा बराच गाजावाजा झाला असला तरी ती केवळ एक हवाच आहे.
ग्राउंड लेव्हलला हा पक्ष कुठेच दिसत नाही असे कॉंग्रेसच्या दिल्लीतील आणि राज्यातील नेत्यांनीही म्हटले आहे. तर भाजपच्या नेत्यांनी आपला अनुल्लेखानेच मारण्याचा प्रयत्न केला आहे. घोडा मैदान जवळच आहे. काय होणार याचे चित्र या आठवड्यातच स्पष्ट होणार आहे. मात्र प्रचाराच्या कोणी काय आघाडी घेतली याचा जर अभ्यास केला तर भाजपचे नियोजन कसे परफेक्ट होते याकडे जाणकारांनी लक्ष वेधले आहे.
भाजपचे प्रचारतंत्र
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी जोरकस प्रचार केला असला तरी मतदाराला मतदान केंद्रापर्यंत आणणारी खरी शक्ती असते ती बूथ कार्यकर्त्याची. भाजपने असे किमान 3 हजार बूथ कार्यकर्ते तयार केले होते. विशेष म्हणजे मुस्लिम बहुल भागातही त्यांचे हे कार्यकर्ते सक्रिय होते. मुस्लिम मतदार हा भाजपचा मतदार नसल्याचे मानले जाते. मात्र त्यामुळे नाउमेद न होता भाजपच्या बूथ कार्यकर्त्यांनी तेथेही संभाव्य मतदारांना आपला हाताला बांधणारा बॅंड दिला. त्यांच्याशी संपर्कात राहीले.
याशिवाय पन्ना प्रमुख ही त्यांची आणखी एक वेगळी संकल्पना. यात एका पानावर जेवढ्या मतदारांचे नाव असते त्यांची जबाबदारी या पन्नाप्रमुखाकडे असते. शिवाय त्यासाठीची एक वेगळी कमिटीही असते. साधारणत: एका पानावरच्या यादीत 30 नावांचा समावेश असतो. पन्नाप्रमुखाने त्यावर आपले लक्ष्य केंद्रीत करायची अशी ही तयारी भाजपने केली होती व त्याबरहुकुम कामही करण्यात आल्याचे एका पन्नाप्रमुखाने माध्यमांशी बोलताना सांगितले. याशिवाय 14 हजार कार्यकर्त्यांनी प्रत्येक मतदाराच्या घरापर्यंत पोहोचूून प्रचार केला. मतदार मतदानासाठी कसा येईल याची दक्षता घेण्यात आली आहे.
कॉंग्रेसने काय केले?
अहमदाबाद संबंधात बोलायचे झाले तर भाजपच्या कार्यालयानजिकच कॉंग्रेसचे कार्यालय आहे. मात्र भाजपच्या ठिकाणी जी वर्दळ होती तीचा पूर्णत: इथे अभाव जाणवला असे प्रत्यक्ष जागेवर जाऊन रिपोर्टींग करणाऱ्या पत्रकारांचे म्हणणे आहे. मात्र आमचा यावेळेचा प्रचार सायलेंट असल्याचा दावा कॉंग्रेसने केला आहे. आम्ही एक लाख कार्यकर्त्यांची फौज मैदानात उतरवली असल्याचा भाजपचा दावा कॉंग्रेसच्या एका नेत्याने फेटाळून लावला. ही बोगस आकडेवारी असल्याचे त्यांनी नमूद केले.
मात्र कॉंग्रेसचे 2 हजार कार्यकर्ते प्रत्यक्ष मैदानात सक्रिय असल्याचे त्यांनी नमूद केले. आम्हीही प्रचार करत आहोत. मात्र आमचे काम शांतपणे सुरू असल्याचे नमूद करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानाकडे लक्ष वेधले. मोदींनीही त्यांच्या प्रचारसभेत कॉंग्रेसचे शांत काम सुरू असून गाफील राहु नका असा सल्ला कार्यकर्त्यांना दिला होता. त्याचा संदर्भ देत कॉंग्रेस नेता म्हणाला की आमचे त्याच पध्दतीने काम सुरू आहे.
आपही कामात
दिल्लीतील अरविंद केजरीवाल यांच्या पक्षानेही प्रचारात आघाडीत घेतली होती. आपबद्दल गुजरातच्या मतदारांत अद्याप विश्वासाचे वातावरण नाही. शिवाय या पक्षाच्या कार्यकर्त्यांचे सांगायचे झाले तर कॉंग्रेस आणि भाजपकडून नाराज होऊन गेलेल्या लोकांचाच तेथे भरणा आहे. शिवाय या पक्षाबाबत परकेपणाची भावना आहे. हे दिल्लीतील लोक आहेत. काहीतरी विकून चालले जातील अशी भावना काही मतदारांनीही व्यक्त केली आहे. त्यामुळे आम्ही आमच्या राज्याची चावी त्यांच्याकडे देणार नाही असे त्यांचे म्हणणे आहे.
तसेच केजरीवालांनी अनेक बाबी फुकट देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यावरही मतदार व्यक्त होताना दिसले. हा व्यापाऱ्यांचा प्रदेश आहे. येथे आम्हाला व्यापार कळतो. कोणी कोणाला काही फुकट देत नाही अशी भूमिका काही जणांनी मांडली तर काहींनी चक्क केजरीवालांच्या मोफतच्या आश्वासनांची गोळाबेरीजही केली. त्यानुसार राज्याच्या बजेटपेक्षाही जास्त मोफत आश्वासनांसाठी निधीची आवश्यकता भासणार असल्याचे या लोकांचे म्हणणे आहे. काहीही असले तरी केजरीवाल आणि त्यांचे कार्यकर्ते दिल्ली मॉडेल मतदारांसमोर मांडताना दिसले.