पारनेर,(प्रतिनिधी) – मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. देश विकासासाठी व लोकशाहीच्या सुदृढतेसाठी मतदानाचे कर्तव्य प्रत्येकाने बजावले पाहिजे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. लक्ष्मण मतकर यांनी केले.
पारनेर येथील न्यू आर्टस्, कॉमर्स अँण्ड सायन्स महाविद्यालयात मतदान जागृती अभियान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. प्राचार्य डॉ. लक्ष्मणराव मतकर पुढे म्हणाले, संविधानाने मतदानाचा अधिकार देशातील प्रत्येकनागरिकाला दिला आहे.
लोकशाहीच्या बळकटीसाठी शासनाचे मतदान जनजागृती अभियान उपयुक्त आहे. सशक्त व सक्षम लोकशाहीचा हा उत्सव आपण शंभर टक्के प्रत्यक्ष मतदान करून साजरा करूयात. याप्रसंगी प्रा. श्याम घनघाव यांनी मतदानाचे महत्त्व व्याख्यानातून सांगितले.
मतदान जनजागृती अभियान अंतर्गत व्याख्यान, मतदान समूह गीत गायन, मतदान संकल्पपत्र भरणे हे उपक्रम राबविले गेले. सांस्कृतिक विभाग सदस्य, सर्व विभाग प्रमुख व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रास्ताविक पर्यवेक्षक प्रा. संजय कोल्हे यांनी केले, तर आभार प्रा. विना आगरकर यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. अशोक शिंदे यांनी केले.