मुंबई – दूरसंचार क्षेत्राला केंद्र सरकारने पॅकेज जाहीर केल्यानंतर व्होडाफोन आयडिया या कंपनीच्या शेअरचा भाव गुरुवारी तब्बल 28 टक्क्यांनी वाढला. व्याडाफोन आयडिया कंपनी आर्थिक अडचणीत आली होती. त्यामुळे या कंपनीने केंद्र सरकारकडे मदतीची अपेक्षा व्यक्त केली होती. याचा विचार करून केंद्र सरकारने पॅकेज जाहीर केले आहे. कालही या कंपनीच्या शेअरच्या भावात तीन टक्क्यांनी वाढ झाली.
विश्लेषकांनी सांगितले की, काल जाहीर केलेल्या पॅकेजचा सर्वाधिक फायदा व्होडाफोन आयडिया कंपनीला होणार आहे. त्याचबरोबर भारती एअरटेल आणि जिओ कंपन्यांनाही दीर्घ पल्ल्यात या पॅकेजचा फायदा होणार आहे.
त्यामुळे या कंपन्यांचे शेअर्सचे भाव उच्च पातळीवर आहेत. मोबाईल कंपन्या आता पायाभूत सुविधावर अधिक खर्च करू शकणार आहेत. त्याचबरोबर सर्व कंपन्यांनी मोबाईल धारकाकडून अधिक रक्कम मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या कंपन्यांना सरकारला मोठ्या प्रमाणात कर द्यावा लागत होता. या पॅकेजमधील तरतुदीनुसार या कंपन्यांना चार वर्षे आता कर देण्याची गरज नाही. हा कर नंतर देता येऊ शकेल.