नातं नवं असतं तेव्हा सुरुवात ही नेहमी ओळख करून देण्यापासून करणं अपेक्षित असतं. ओळख म्हणजे तरी काय? नाव? ते फक्त लेबल असतं. बाकी माहिती ही महत्त्वाची नसावी. त्याने रकाने भरतात. “ओळख’ होतेच असे नाही. ती व्हावी म्हणून तर हा प्रपंच. अर्थात शब्दाआड लपणं ही तशी सोपी गोष्ट आहे. लिखित काही वाचून माणूस समजतोच असं नाही. घराच्या दर्शनी भागात एखादी खिडकी असते. तिच्यावर अर्धपारदर्शक, शुभ्र पडदा असतो. बाहेरच्या लख्ख उन्हातून घरातल्या आकारांच्या सावल्या दिसतात. त्यासुद्धा खिडकीसमोर येतील तितक्याच. त्यावरून पूर्ण घराचा अंदाज बांधणं निष्फळ असतं. तसंच लेखनातून आपण एकमेकांना जाणून घेणं सोपं असणार नाही. पण प्रयत्न करायला काय हरकत आहे?
लेखन हे व्यक्तिनिहाय बदलते शोभचित्र असते. अनुभव, लिंग, समाजस्थान, आर्थिक स्तर असे खूप कंगोरे लेखनाची नक्षी कोरतात. दर वेळी ते सुबक होईलच असं नाही. पण सौंदर्य सुबकतेतच असावं असं नियम कुठाय? विरूप आणि कुरूप ही सुद्धा आकर्षक रूपं असतात. लेखिका लिहिते तेव्हा ती आधी स्त्री आणि मग माणूस असते. हा क्रम उलटणे हा अथक प्रवास आहे.
स्त्री लेखनकर्त्यांना मी “शब्दकारा’ असा शब्द आवर्जून योजिला आहे. अशी कुणी जी शब्द घडवते आणि अशी कुणी जी शब्दांच्या कारात, तुरुंगात, अडकलेली आहे. शब्दांच्या पल्याड जे सापडतं ते कागदावर उतरवण्याची धडपड असते. त्यांच्या एकूण लेखन प्रवासाबद्दल काही निष्कर्ष असे. जगात ज्या कुणी शब्दकारा होऊन गेल्यात त्यांच्या एकूण जगण्याची सरासरी काढली तर काही ठळक मुद्दे दिसून येतात. सगळ्याच जणी सुखी, वैवाहिक वगैरे आयुष्य जगत नसतात. पाठी, पुढे, सोबत कुठेही एखादा तिचा असा पुरुष, मग तो कोणत्याही नात्याने का असेना, असेलच असं नाही. फॉर दॅट मॅटर, स्त्री सुद्धा. ज्या शब्दकारा कुटुंबात राहात असतात त्या घर व घरगुती कर्तव्यांना प्राधान्य देतात. शब्दसंसार हा दुय्यम असतो. ठरतो, ठरवावा लागतो. त्या गृहिणी असल्यास चुलीचं देणं आधी आणि लेखणीचं नंतर, हे सोयीचं ठरतं. मग रांधताना मनात जे खदखदतं ते मंद आचेवर उकळू देत ठेवावं लागतं. त्याच्या धगीनं काही वेळा ती वा तिचा परिसर होरपळतोच. मग चेहऱ्यावर त्याची वाफ धरू न देण्याचं कौशल्य हळूहळू साधत जातं. ते मनःशांतीसाठी हितावह ठरतं. पूर्णवेळ लेखनाला वाहून घेणं हे सौभाग्य, धनाच्या राशीवर बसून असल्यास सुखाचं किंवा सोपं होऊ शकतं.
एकाच वेळी भाकरी, भाकरीसाठी चाकरी व कागदासाठी शाई याकरिता ज्यांना धडपडावे लागले वा लागते त्या, शब्दकारा किती मोठ्या आहेत याहीपेक्षा ताकदीच्या उजव्या स्त्रिया अधिक असतात. अर्थात सुखाने गुंगी आलेली लेखणी तिची प्रसवक्षमता गमावण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्वतःचे धन, स्वतःचा वेळ आणि स्वतःची खोली ही सौभाग्यवती शब्दकारेची सुखस्थानं असतात. शब्दकारेला इतर जग नकोच असते किंवा फटकून असण्याची इच्छा असते किंवा एकलीच्या ऐनेमहालात बसून तिला कागद नासायचे व शब्द उधळायचे असतात; असा कोणताही मताग्रह इथे अपेक्षित नाही. जगातली तुच्छ, दुय्यम परंतु गरजेच्या असलेल्या निम्म्या प्रजातीला शब्दांची कौतुकं करत बसणं हे दर वेळी शक्य, प्राप्य, साध्य असतंच असं नाही. मग तिची व्यक्त होण्याची साधनं व मार्ग बदलतात. त्यातलाच एक अव्यक्त राहणे हा देखील असतो. कुठल्याही अनुकूल वा प्रतिकूल परिस्थितीत जिला व्यक्त होता येतं ती स्त्री परमभाग्याची. उर्वरितांसाठी मनःपाताळ प्रदेश मोकळा आहे. कातडीबचावू टिप्पणी : उपरीनिर्दिष्ट मतं ही माझ्या तुटपुंज्या जगण्यातली चिमूटभर अनुभवांची आहेत. यात अनेक अपवाद असतीलही. असोत. जगात सगळं काही असतंच. अगाथा ख्रिस्तीची एक रहस्यकादंबरी लिहिणारी लेखिका आहे जी सतत सफरचंद खात लिहीत असते. मला आवडेल असं सटरफटर चरत चरत लिहिणं. नावाला जागायला हवं ना?
दगड आणि फुलं
सुचरिता