एकरकमी 2789 एफआरपी उद्या बॅंकेत वर्ग : जिल्ह्यातील पहिलाच कारखाना ठरला
वाघळवाडी – श्री सोमेश्वर सहाकरी साखर कारखाना एकरकमी एफआरपी शेकऱ्यांना देणार असल्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी सांगितले. तर असा निर्णय घेणारा “सोमेश्वर’ जिल्ह्यातील पहिलाच सहकारी कारखाना ठरला आहे. सोमेश्वरच्या या निर्णयामुळे अन्य कारखान्यांनाही आता स्पर्धात्मक दर द्यावा लागणार आहे.
दरम्यान, 15 डिसेंबरपर्यंत ऊस तुटलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर सोमवारी (दि. 30) प्रतिटन 2789 रूपयेप्रमाणे एकरकमी रक्कम वर्ग होणार असल्याने शेतकऱ्यांचा थर्टी फर्स्ट “गोड’ होणार आहे.
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने जिल्ह्यात सर्वप्रथम भावाची कोंडी फोडत एफआरपीच्या 80 टक्के रक्कम देण्याचा निर्णय डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात घेतला होता. शेतकऱ्यांना उसाची बिले अदा करण्याची वेळ आल्यावर मात्र, संचालक मंडळाने एकरकमी एफआरपी अदा करण्याचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना खूष केले आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण कराव्या लागणार आहेत.
मात्र, यासाठी कारखान्यांना आर्थिक कसरत करावी लागणार आहे. सोमश्वर कारखाना तुलनेने आर्थिक सक्षम आहे, त्यामुळे स्वतःचा पुरेसा ऊस असतानाही कारखान्यांनी एकरकमी एफआरपीचा निर्णय घेतला आहे. खासगी कारखान्यांनाही आता ऊस उपलब्धता व्हावी, म्हणून एकरकमी एफआरपीचा मार्ग स्वीकारावा लागेल, अशी चिन्हे आहेत.
अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एकरकमी एफआरपीचा निर्णय घेतला आहे. सभादांचे एप्रिलअखेर उसाचे गाळप केले जाणार असून मागील हंगामाप्रमाणेच सर्वच बाबतीत अग्रेसर राहणार. तसेच अन्य कारखान्यांच्या तुलनेत अंतिम भावात कुठेही कमी पडणार नाही. अवकाळी पावसामुळे व हवामान बदलामुळे
उसाला मोठ्या प्रमाणावर तुरे आले आहेत.
परीणामी सभासदांचाच ऊस प्राधान्याने गाळप करण्याचे ठरले आहे. यासाठी सोमेश्वरने गेटकेन उसाचे गाळप पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कारखान्याने आजअखेर दोन लाख टन उसाचे गाळप केले असून 10.70 टक्के साखर उतारा राखत 2 लाख 8 हजारपेक्षा अधिक क्विंटल साखरेची निर्मीती केली आहे, अशी माहिती जगताप यांनी दिली.