भारत आणि इंग्लड संघात तिसरा टी-२० सामना मंगळवारी पार पडला. या सामन्यात इंग्लडने ८ गडी राखून भारतीय संघाचा पराभव केला.मात्र पुन्हा एकदा भारतीय संघाचा सलामी फलंदाज केएल राहुल सलग तिसऱ्या सामन्यात अपयशी ठरला. त्यामुळे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने हा सामना संपल्यानंतर केएल राहुल बाबत एक मोठी प्रतिक्रिया दिली आहे. ज्यामध्ये विराट कोहलीने खराब फॉर्ममधून जात असलेल्या केएल राहुलला पाठींबा दिला आहे.
विराट कोहलीने केएल राहुलला पाठींबा देताना म्हणाला, असे कोणाच्याही बाबतीत घडू शकते. त्याने केएल राहुलला चॅम्पियन प्लेयर म्हणताना आणि स्वत:चे उदाहरण देताना सांगितले की, तो कसा खराब फॉर्ममधून जात होता. तसेच सामना समाप्तीनंतर विराट कोहली म्हणाला, ”दोन सामन्यापूर्वी मी सुद्धा खराब फॉर्ममधून जात होतो. जर तुम्ही मागील २-३ वर्षापूर्वी टी-२० क्रिकेटमधील त्याचे आकडे पाहिले, तर कदाचित सर्वात चांगले त्याचे आकडे आहेत. तो रोहित शर्मा सोबत सातत्याने सलामीला फलंदाजी करेल आणि आम्हाला त्याच्याबद्दल कोणतीही चिंता नाही. आम्हाला माहित आहे की, एकदा त्याचे शॉट बसायला सुरुवात झाली ना मग तो ५-६ चेंडूत संपूर्ण वातावरणच बदलू शकतो.”
केएल राहुल सलग तिसऱ्या सामन्यात अपयशी ठरला
भारत आणि इंग्लड संघात सद्या टी-२० मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील आतापर्यंत तीन सामने पार पडले आहेत. या तीन ही सामन्यात भारतीय संघाचा सलामी फलंदाज केएल राहुल अपयशी ठरला आहे. त्याने या तीन सामन्यात १, ० आणि ० धावा केल्या आहेत. त्याला पहिल्या तीन सामन्यात अनुक्रमे जोफ्रा आर्चर, सॅम करन आणि मार्क वुड यांनी बाद केले.
परंतु या मालिकेच्यापूर्वी मागील २-३ वर्षात टी-२० क्रिकेटमध्ये राहुलने सातत्याने धावा काढल्या आहेत. मात्र आता सुरु असलेल्या मालिकेतील पहिल्या तीन सामन्यात अपयशी ठरला आहे.