पुणे – दिवाळीतील फटाके, उघड्यावरील अन्न पदार्थ खाणे आणि वातावरणातील सततच्या बदलामुळे श्वसन समस्यांसोबतच मुलांमध्ये विषाणूजन्य तापाची समस्या वाढल्याचे दिसून येते. त्यामुळे पालकांनी मुलांच्या आरोग्याकडे लक्ष देत, त्यांना संतुलित आहार देणे महत्त्वाचे आहे. आजार अंगावर न काढता, डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावेत, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे.
शहरासह राज्यातील काही प्रमुख शहरातील हवा दूषित, त्यात दिवाळीतील फटाक्यांमुळे हवेत दूषित कणांचे प्रमाण वाढल्यामुळे श्वसनाचे विकार वाढले. विशेषत: लहान मुलांना या समस्या अधिक उद्भवत आहे. याबाबत बालरोगतज्ञ डॉ. वृषाली बिचकर म्हणाल्या, प्रक्रिया केलेले पदार्थ, शर्करायुक्त पदार्थांचे सेवन केल्याने वजन वाढते आणि दात किडतात आणि भविष्यात मधुमेहासारखी समस्या निर्माण होण्याचा धोका वाढतो.
त्याचप्रमाणे, तेलकट पदार्थांचे जास्त सेवन केल्याने आम्लपित्त, पोट फुगणे, छातीत जळजळ आणि अपचन यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. दिवाळीनंतर लगेचच विषाणूजन्य तापामध्ये पाच ते दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. हे प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेत अधिक आहे. खोकला, सर्दी, घसा खवखवणे, ताप, उलट्या होणे, अशा सामान्य तक्रारी आढळून येतात.
श्वसनाच्या आजारांत वाढ
दिवाळीनंतरच्या कालावधीत पाच ते पंधरा वयोगटातील मुलांमध्ये ब्रॉन्कायटिसच्या रुग्णांमध्ये वाढ दिसून येते. तर प्रदूषणामुळे दम्याच्या रुग्णांचीही संख्या वाढत आहेत. त्यासाठी प्रदूषण आणि फटाक्यांच्या धुराचा प्रादुर्भाव कमी करणे, मास्कचा वापर करणे तसेच धूळ, परागकण, प्राण्यांची केस किंवा श्वासोच्छवासाच्या समस्यांना कारणीभूत असलेल्या कोणत्याही गोष्टींकडे दुर्लक्ष करू नये आणि त्यांचे निरीक्षण करा. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे औषधोपचार घ्या, असा सल्ला डॉ. सम्राट शाह यांनी दिला आहे.