खेड-शिवापूर – देशातील चार क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग असलेल्या पुणे- बेंगलोर महामार्गावर खेड-शिवापूरलगतची गावे लॉकडाऊनची गावे लॉकडाऊनमुळे आर्थिकदृष्ट्या बाधित झाली आहेत. महामार्ग झाल्यापासून या परिसरातील गावांनी अर्थकारणात प्रगती केली होती. दरडोई उत्पन्न मिळत असल्यामुळे येथील व्यावसायिक आणि शेतकऱ्यांना बरकत आली होती. मात्र, लॉकडाऊनचा फटका जिव्हारी लागला आहे.
सातारा महामार्ग हा प्रचंड वर्दळीचा परिसर आहे. पुणे, मुंबईचे पर्यटक महाबळेश्वरला तसेच सातारा, सांगली, कराड, कोल्हापूर तसेच कर्नाटकात जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर करत असतात. अनेक छोटे-मोठे व्यावसायिक हे मोठ्या प्रमाणात आहेत. लॉकडाऊन झाल्यामुळे सर्व व्यवसाय ठप्प झाले आहेत. सर्व व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
महामार्गालगतचे हॉटेल ओस
सातारा महामार्गावर हॉटेल व्यवसाय मोठ्या प्रमाणात विस्तारला आहे. पुणे- सातारा महामार्ग हा कायम गजबजलेला असतो. दिवसभरात सुमारे तीन ते चार वाहने या महामार्गावरून जात असतात. कर्नाटकापर्यंत या महामार्गावरून वाहतूक होत असते. पुणे ते सातारा या दरम्यान, सुमारे 150 हॉटेल्स आहेत. या हॉटेल्समधून सरासरी 1 हजार कामगार काम करीत असतात. महामार्गालगतच्या हॉटेल्समुळे कामगार, पूरक घटकांना रोजगारवाटा मिळाल्या आहेत. गेल्या 22 वर्षांत हा महामार्ग अर्थकारणाला दिशा देणारा ठरला आहे. आता लॉकडऊन झाल्यामुळे हॉटेल व्यवसाय ठप्प झाला आहे.
हॉटेलमध्ये जास्त कामगार होते. आता काही कामगार हे गावाकडे गेले आहेत. तर जे जाऊ शकले नाही त्यांची हॉटेलमध्येच रोजच्या जेवणाची व राहण्याची सोय स्वत: हॉटेल मालकांनी केली आहे. आता लॉकडाउन मुळे हॉटेल बंद आहेत. त्यात कामगाराचा रोजच्या जेवणाचा खर्च हा हॉटेल मालकाला करावा लागत आहे. लॉकडाऊनमुळे सर्व हॉटेल व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
– गणेश पायगुडे, हॉटेल व्यावसायिक, खेड- शिवापूर