नगर – मराठा समाजातील युवकांना सक्षम करण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे पुनरुज्जीवन करण्यात आले आहे. युवकांना उद्योगधंदे व व्यवसायासाठी बीजभांडवल उपलब्ध करुन स्वत:च्या पायावर उभे करणे या महामंडळाचे मुख्य उद्देश आहे,अशी भूमिका अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी मांडली.
सकल मराठा समाजाच्या वतीने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांच्या माहितीच्या प्रसाराकरिता अक्षता गार्डनमध्ये युवकांसाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना नरेंद्र पाटील बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संग्राम जगताप, चंद्रकांत गाडे, माजी महापौर शिलाताई शिंदे उपस्थित होत्या.
गाव तेथे उद्योजक निर्माण करण्याचे ध्येय घेऊन कार्याला सुरुवात केली आहे. महामंडळाच्या माध्यमातून तळागाळातील मराठा समाजातील युवक-युवतींना याचा लाभ मिळण्यासाठी तालुकास्तरीय मेळावे घेणार असून, मराठा क्रांती मोर्चाच्या प्रत्येक जिल्ह्यातील समन्वय समितीबरोबर बैठक घेऊन युवकांना कर्ज प्रकरणासाठी येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्याचे काम केले जाणार असल्याची भूमिका पाटील यांनी मांडली.
राज्यातील अनेक महामंडळ पोलीस यंत्रणेच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहे. मात्र हे महामंडळ सुरु करताना अत्यंत बारकाईने अभ्यास करुन युवकांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहे. 8 लाख रुपयाच्या आत उत्पन्न असलेल्या युवक-युवतीना व्यवसाय व उद्योगधंद्यासाठी 10 लाख रुपये पर्यंतचे कर्ज दिले जाते. ही योजना पुर्णत: ऑनलाईन असून, आवश्यक कागदपत्रांची पुर्तता केल्यावर बॅंकेकडून हे कर्ज मिळते. नवीन व्यवसाय करणाऱ्या युवकांना आयटी रिटर्नची आवश्यकता नसते. मात्र एखादा लाभार्थी व्यवसाय वाढविण्यासाठी कर्ज घेत असेल तर त्याला आयटी रिटर्नची गरज भासते.
कर्ज प्रकरण मंजूर झाल्यानंतर पहिला हप्ता मुद्दलसह 12 टक्के व्याज दराने भरावा लागतो. नंतर दुसऱ्या किंवा तीसऱ्या हप्त्यात भरलेल्या व्याजाचा परतावा पुन्हा मिळतो. 1998 ते 2017 पर्यंत फक्त 1300 लाभार्थींना याचा लाभ मिळाला होता. मात्र दोन वर्षात या महामंडळाकडून 10 हजार युवकांना कर्ज मिळाले असल्याचे सांगून, त्यांनी महामंडळाच्या मागील व सध्या चालू असलेल्या कार्याचा आढावा घेतला.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन या मेळाव्याची सुरुवात करण्यात आली. एक मराठा लाख मराठा… छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने सभागृह दणाणून निघाले. वर्षभर उपवास करणाऱ्या पाटील यांचा उपस्थित महिलांनी सत्कार केला.