मुंबई – हा विजय सर्वसामान्य जनतेचा आहे. या विजयाने घरचे प्रचंड आनंदी आहेत. जे काम आम्ही करतोय त्याचे त्यांना समाधान आहे. या पुढच्या काळात अधिक चांगले काम करण्याच्या शुभेच्छाही कुटुंबाने दिल्या आहेत. आबा असते तर वेगळे मार्गदर्शन मिळाले असते. वेगळी परिस्थिती निर्माण झाली असती अशी प्रतिक्रिया दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांनी दिली.
एका माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, आबांनाही राजकारणात 20 ते 30 वर्ष संघर्ष करावा लागला. त्यानंतर ते शिखरावर पोहोचले. संघर्ष आम्हाला नवा नाही. नगरपंचायतीच्या निवडणुकीतही संघर्ष करावा लागला.
नगर पंचायत निवडणुकीत दणदणीत यश मिळवल्यामुळे रोहित पाटील यांच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे. ते म्हणाले, आबा गेल्यानंतर जी परिस्थिती ओढवली होती. त्यातून आम्ही सर्व मार्ग काढत होतो. हा मार्ग काढत असताना त्यांची उणीव नेहमीच भासली. पण त्यांची शिकवण आमच्याबरोबर नेहमी होती. त्यांचे विचार आमच्यासोबत नेहमी होते. मी रक्ताचा वारसदार असलो तरी आबांनी विचाराचे वारसदार तयार केले आहेत. त्या विचारांच्या वारसदारांच्या जोरावरच आमची वाटचाल सुरू आहे. त्यामुळे आज आबा नाहीत याची उणीव आम्हाला भासत आहे.
लहानपणापासून आबांचा फार सहवास लाभला नाही. त्यामुळे या विजयानंतर त्यांची प्रतिक्रिया काय असती हे माहीत नाही. पण त्यांनी विकासाचा डोंगर उभा केला आहे. 2014च्या विधानसभेला साडेपाच ते सहा हजाराचे मताधिक्य मिळाले होते. एवढी कामे करूनही कमी मताधिक्य मिळाल्याचे शल्य त्यांना बोचले होते. पण मागच्या निवडणुकीत त्याच तालुक्यात आम्ही 13 हजाराचे मताधिक्य मिळवले. विधानसभेतील आश्वासने दोन वर्षात पूर्ण केली. दिलेला शब्द पाळतो हे लोकांना दिसून आले आहे. जनतेचा आमच्यावरील विश्वास वाढला आहे. त्यामुळे हा विजय मिळाला आहे.