पुणे – पर्यावरणाचे कारण पुढे देत महापालिकेकडून वेताळ टेकडीच्या खालील बाजूने प्रस्तावित असलेल्या बालभारती-पौडफाटा रस्त्यास विरोध केला जात आहे. मात्र, ज्या विधी महाविद्यालय रस्त्यावरील तसेच प्रभातरस्ता, भांडारकर रस्ता, बीएमसीसी महाविद्यालय रस्त्यांकडून सेनापती बापट रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनांची कोंडी फोडण्यासाठी हा पर्यायी रस्ता केला जाणार आहे.
त्या सध्याच्या रस्त्यावर पौडफाटा- विधी महाविद्यालय रस्ता ते बालभारती हे अवघे सव्वादोन किलोमीटचे अंतर पार करण्यासाठी अनेकदा वाहनचालकांना तब्बल 20 ते 45 मिनिटांचा कालावधी लागत असल्याचे समोर आले आहे.
महापालिकेकडून हा रस्ता प्रस्तावित करण्यात आल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन अहवाल तयार केला आहे. या अहवालात या रस्त्याबाबत “सोशल इकॉनॉमिक स्टडी’अंतर्गत वाहनचालकांची मते नोंदविण्यात आली होती.
त्यावरून सध्याच्या पौड फाटा- विधी महाविद्यालय रस्ता- बालभारती मार्गावर प्रवासासाठी लागणाऱ्या वेळेची माहिती संकलित करण्यात आली आहे. या विश्लेषणातून ही बाब समोर आली आहे. सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी सुमारे 20 ते 45 मिनिटांचा कालावधी लागत असल्याचे 90.60 टक्के वाहनचालकांनी म्हटले आहे.
नवा रस्ता झाल्यास पाच मिनिटांत प्रवास
या रस्त्यास पर्यावरणाचे कारण देत मोठ्या प्रमाणात विरोध केला जात आहे. मात्र, प्रत्यक्षात या रस्त्याबाबत महापालिकेने वेगवेगळे अहवाल केले असून ते पालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यातील पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन अहवालात विद्यमान रस्त्याच्या स्थितीबाबत सोशल- इकॉनॉमिक स्टडीही देण्यात आलेला आहे.
या अभ्यासात या रस्त्यावरून वाहने घेऊन जाणाऱ्या वाहनचालकांचा वेगवेगळ्या चौकात सॅंपल सर्व्हे करण्यात आला आहे. यातून वाहनचालकांची मते नोंदवून, त्यानुसार ही बाब या अहवालात नमूद करण्यात आली आहे. मात्र, महापालिकेने प्रस्तावित केलेला रस्ता झाल्यास हाच वेळ 5 मिनिटांपेक्षाही कमी होणार आहे.