माधव विद्वांस
आधुनिक मराठी साहित्यिक, सौंदर्यमीमांसक, पत्रकार, व्याख्याते व विचारवंत प्रभाकर पाध्ये. त्यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथे झाला. त्यांचे मूळ नाव प्रल्हाद होते, ते पुढे केव्हातरी प्रभाकर झाले. त्यांचे शिक्षण रत्नागिरी, मुंबई आणि पुणे येथे पार पडले. वर्ष 1927 मध्ये ते मॅट्रिक झाले व वर्ष 1932 मध्ये एल्फिन्स्टन महाविद्यालय, मुंबई येथून अर्थशास्त्र व इतिहास हे विषय घेऊन बीए झाले.
अर्थशास्त्र घेऊन एमए होण्यासाठी ते पुण्याला गोखले अर्थशास्त्र संस्थेत दाखल झाले; परंतु एमए न होताच मुंबईस परतले व नोकरीला लागले. हरिभाऊ मोटे यांच्या “प्रतिभा’ पाक्षिकात मुद्रणशोधनाची कामे, लेखन असा त्यांच्या अर्थार्जनाचा श्रीगणेशा झाला. हे काम करता करता ते पत्रकारही झाले व योगायोगाने त्यांची पत्रकारिता सुरू झाली. त्यानंतर प्रतिभा, चित्रा, धनुर्धारी, दैनिक नवशक्ती या नियतकालिकांत संपादक म्हणून काम पाहिले.
“धनुर्धारी’मध्ये काम करीत असतानाच 4 जानेवारी 1940 रोजी कमल गोठोस्कर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. नवशक्तीत असताना एक तडफदार व व्यासंगी पत्रकार म्हणून त्यांचा लौकिक झाला. पुढे ते त्या पत्रातून बाहेर पडले. त्यानंतर “इंडियन कमिटी फॉर कल्चरल फ्रीडम’ या संस्थेचे सचिव (1953-54) व ‘कॉंग्रेस फॉर कल्चरल फ्रीडम’चे आशियाई प्रतिनिधी (1955-67) या नात्यांनी त्यांनी काम केले. 1967 पासून “सेंटर फॉर इंडियन रायटर्स’ या संस्थेचे ते संचालक होते. कामाच्या निमित्ताने जगभरचा प्रवास त्यांना घडला.
“आजकालचा महाराष्ट्र’ (1935) हे त्यांचे पहिले पुस्तक त्यांनी श्री. रा. टिकेकर यांच्या सहकार्याने लिहिले. त्यानंतर त्यांच्या साहित्यात समीक्षात्मक आणि सौंदर्यशास्त्रविषयक कलेची क्षितिजे (1942), मर्ढेकरांची सौंदर्यमीमांसा (1970), पाटणकरांची सौंदर्यमीमांसा (1977), आस्वाद (1977), वामन मल्हार आणि विचारसौंदर्य (1978) यांसारख्या ग्रंथांचा समावेश होतो. त्यांच्या पर्यटनविषयक लेखनात नवे जग नवी क्षितिजे (1953), अगस्तीच्या अंगणात (1957), उडता गालिचा (1959), तोकोनोमा (1961), हिरवी उन्हे (1964) या प्रवासवर्णनांचा समावेश होतो. त्यांनी “व्यक्तिवेध’ या नावाने लिहिलेली शब्दचित्रे 1973 मध्ये प्रसिद्ध झाली. तसेच “निळे दिवस’ या कथासंग्रहातून अनेक कथा लिहिल्या.
त्यांनी कलेची क्षितिजे या समीक्षात्मक ग्रंथात कलेच्या स्वरूपासंबंधी मूलभूत प्रश्नावर विवेचन केले आहे. त्यांच्या नवीन राजकीय व सामाजिक लेखनामधील मार्क्सवादी दृष्टिकोन तसेच कलासाहित्य माध्यमातून होणारा मतप्रचार, या बाबतीत चर्चा केली आहे. कला हे निवेदन की आविष्कार, कलासाहित्य आणि विज्ञान यांचे परस्परसंबंध अशा अनेक ज्वलंत प्रश्नांची मांडणी त्यांनी केली आहे.
“मर्ढेकरांची सौंदर्यमीमांसा’ या ग्रंथात त्यांनी मर्ढेकरांच्या सौंदर्यविचारांची यथायोग्य मीमांसा केलेली आहे. मर्ढेकरांच्या सौंदर्यविचाराचे मर्म नेमके काय, हे त्यांनी विस्तृतपणे मांडून मराठीतील कलाविष्काराचा परामर्श घेतला. सौंदर्यमीमांसक लेखक राजाराम भालचंद्र पाटणकर यांच्या सौंदर्यमीमांसेवर त्यांनी केलेले भाष्यही असेच समतोल व मूलग्राही आहे.
वर्ष 1950 मध्ये झालेल्या गोमंतक साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. तसेच 1952 मध्ये मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. 22 मार्च 1984 रोजी त्यांचे निधन झाले.