– माधव विद्वांस
‘पद्मभूषण’ ‘महाराष्ट्रकवी’ बडोदा संस्थानचे ‘राजकवी’, रविकिरण मंडळातील नामांकित कवी यशवंत यांचा आज जन्मदिन.
त्यांचे संपूर्ण नाव यशवंत दिनकर पेंढरकर. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील तारळे येथे 9 मार्च 1899 रोजी झाला. लहान वयातच वाई येथील लोकमान्य टिळकांचे सहकारी कीर्तनकार डॉ. दत्तोपंत पटवर्धन यांची राष्ट्रवादी वृत्तीचा संस्कार करणारी कीर्तने यशवंतांनी ऐकली होती व त्याचा प्रभाव त्यांच्यावर होता. त्यांचे शिक्षण सांगली येथील सिटी हायस्कूलमधून झाले. डिपार्टमेंट स्कूल फायनलच्या परीक्षेत ते उत्तीर्ण झाले. पुढचे शिक्षण प्रतिकूल परिस्थितीमुळे त्यांना घेता आले नाही.
मॅट्रिक पास झाल्यानंतर पुण्यास लेखनिक म्हणून काम करू लागले. पुणे येथे सुरुवातीस काव्यरचने संबंधीचे मार्गदर्शन त्यांना कवी साधुदास (गोपाळ गोविंद मुजुमदार) यांच्याकडून मिळाले. यशवंतांचा राष्ट्रीय स्वरूपाची कविता लिहिण्याकडे कल होता. त्याच सुमारास पुण्यात रविकिरण मंडळाची स्थापना झाली. पुणे येथे त्यांना प्रा. श्री. बा. रानडे आणि मनोरमा या दांपत्याने आपल्या कुटुंबातील मानले. सातारा जिल्ह्यातील फत्यापूरचे कवी गिरीश त्यांना मित्र म्हणून लाभले.
रविकिरण मंडळात ते सामील झाले व तेथे इंग्रजीतील स्वच्छंदतावादी कवितेचा प्रभाव त्यांच्यावर पडला. यशोधन (1929) हा त्यांचा पहिला मोठा आणि लोकप्रिय कवितासंग्रह. त्यानंतरचे त्यांचे ‘यशोगन्ध’, ‘यशोनिधि’, ‘यशोगिरी’, ‘ओजस्विनी’ असे अनेक काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले. त्यांच्या कवितेमध्ये सामान्यांच्या सुखदुःखांशी निगडीत आशय असल्याने साहजिकच रविकिरण मंडळात त्यांना सर्वाधिक लोकप्रियता मिळाली. त्यांच्या दीर्घ काव्यरचनेमधे ‘एक प्रेमकथा’, ‘बन्दीशाळा’, ‘काव्यकिरीट’ या कवितांचा समावेश आहे.
‘काव्यकिरीट’ हे बडोद्याच्या राजपुत्राच्या राज्यारोहणाबाबत खंडकाव्य आहे. ‘बंदीशाळा’ या काव्यातून बालगुन्हेगारांच्या करुणात्मक स्थितीचे चित्रण करणारे खंडकाव्य आहे. ‘छत्रपती शिवराय’ हे महाकाव्य रचले. पानशेत धरण फुटले त्या दुर्घटनेवर आधारलेले ‘मुठे, लोकमाते’ हे दीर्घकाव्यही त्यांनी लिहिले.
बालचमूसाठी ‘मोतीबाग’ हा बालगीतांचा संग्रह आहे. एकत्र कुटुंब पद्धतीतील शाश्वत जीवनमूल्यांचे महत्त्व बरेच ठिकाणी त्यांनी विशद केले आहे. ‘प्रीतिसंगम’, ‘प्रेमाची दौलत’, ‘चमेलीचे झेले’ आणि ‘एक कहाणी’ या कवितांमधून यशवंतांच्या प्रेम कविता साकारल्या. गाऊ त्यांची आरती हे त्यांचे सैनिकांच्या शौर्याला समर्पित गीत होते.
त्यांच्या ‘आई’ या कवितेतील गोडवा आजही कायम राहिला आहे. शामची आई या चित्रपटातील ‘आई म्हणोनि कोणी, आईस हाक मारी ती हाक येई कानी, मज होय शोककारी… स्वामी तिन्ही जगांचा आईविना भिकारी’ हे वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेले व आशा भोसले यांनी स्वरबद्ध केलेले गीत ऐकल्यावर डोळ्यात पाणी येतेच. ‘नीज नीज माझ्या बाळा करू नको चिंता’ हे गीतही यशवंतांचेच आहे.
गद्य लेखनामधे ऑस्ट्रियाई लेखक स्टीफन यांच्य दीर्घकथेवरून यशवंतांनी ‘घायाळ’ ही कादंबरी लिहिली त्यांनी जव्हार संस्थानचे राष्ट्रगीत रचले होते. त्यांना 1940 मध्ये बडोद्यात ‘राजकवी’ या पदवीने गौरविण्यात आले होते. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर कवी यशवंत यांना ‘महाराष्ट्र कवी’ म्हणून गौरविण्यात आले. वर्ष 1950 मधे मुंबईत भरलेल्या 33व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.