माधव विद्वांस
भारतीय मुत्सद्दी, राजकारणी आणि स्वातंत्र्यसैनिक, भारताचे माजी पंतप्रधान इंदरकुमार गुजराल यांचा आज स्मृतिदिन. इंदरकुमार गुजराल यांचा जन्म 4 डिसेंबर 1919 रोजी एका पंजाबी कुटुंबात ब्रिटिश भारतातील अविभाजित पंजाबमधील झेलम जिल्ह्यातील सोहावा तहसीलमधील परी-दरवेजा गावात, अवतार नारायण आणि पुष्पा गुजराल या दांपत्याचे पोटी झाला.
त्यांचे शिक्षण सध्याच्या पाकिस्तानातील पंजाबमधेच झाले. ते “ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन’चे सदस्य होते. त्यांनी भारतीय स्वातंत्र्यचळवळीतही भाग घेतला. “भारत छोडो’ आंदोलनादरम्यान भाग घेतल्यामुळे वर्ष 1942 मध्ये त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. विद्यार्थीदशेतच ते “भारतीय कम्युनिस्ट पक्षा’चे सदस्य झाले.
फाळणीनंतर ते भारतात आले व वर्ष 1958 मध्ये नवी दिल्ली म्युनिसिपल कमिटीचे उपाध्यक्ष बनले. वर्ष 1964 मध्ये ते कॉंग्रेसमध्ये सामील झाले. वर्ष 1964 मध्ये ते राज्यसभेचे सदस्य झाले. 1975च्या आणीबाणीच्या काळात, गुजराल हे माहिती आणि प्रसारणमंत्री होते. तसेच सेन्सॉरशिपच्या काळात मीडियाचे आणि दूरदर्शनचे प्रभारी होते. नंतर त्यांना नियोजन मंत्रालयात हलवण्यात आले. त्यांच्या जागी विद्याचरण शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली होती.
वर्ष 1976 मध्ये त्यांची पुन्हा राज्यसभेवर निवड झाली. त्यांनी जलसंपदा मंत्री म्हणूनही काम केले. इंदिरा गांधींनी गुजराल यांना सोव्हिएत युनियनमध्ये भारताचे राजदूत म्हणून नियुक्त केले होते. त्यांच्या कर्तृत्वाची खास बाब म्हणजे आखाती युद्धादरम्यान भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसंबंधी सद्दाम हुसेन यांच्याकडून तेथे जाऊन हमी प्राप्त केली.
त्यावेळी सद्दाम हुसेन यांना त्यांनी मिठी मारली होती. 1996च्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर जेव्हा एच. डी. देवेगौडा यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त आघाडी सरकार स्थापन करण्यात आले, तेव्हा गुजराल यांना पुन्हा परराष्ट्रमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यांनी भारताच्या शेजारी देशांशी चांगले संबंध ठेवण्यावर भर दिला. या कार्यकाळात त्यांनी केलेली कामगिरी “गुजराल सिद्धांत’ म्हणून ओळखली जाते.
“गुजराल सिद्धांत’ हा भारताच्या जवळच्या शेजारी, विशेषत: पाकिस्तानशी परराष्ट्र संबंधांचे मार्गदर्शन करण्यासाठी पाच तत्त्वांचा संच आहे. या सिद्धांताबद्दल पत्रकार भबानी सेन गुप्ता यांनी त्यांच्या आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये भारत लेखात त्याचे वर्णन केले आहे. “तत्कालीन युनायटेड फ्रंट सरकारचे शेजाऱ्यांसोबतचे धोरण आता पाच मूलभूत तत्त्वांवर उभे असावे.
प्रथम नेपाळ, बांगलादेश, भूतान, मालदीव आणि श्रीलंका यांसारख्या शेजारी देशांसोबत सद्भावनेने आणि विश्वासाने जे काही करता येईल ते देतो. दुसरे म्हणजे कोणताही दक्षिण आशियाई देश आपला भूभाग प्रदेशातील अन्य देशाच्या हितासाठी वापरण्याची परवानगी देणार नाही. तिसरे म्हणजे कोणीही दुसऱ्याच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करणार नाही.
चौथे म्हणजे सर्व दक्षिण आशियाई देशांनी एकमेकांच्या प्रादेशिक अखंडतेचा आणि सार्वभौमत्वाचा आदर केला पाहिजे आणि शेवटी, ते त्यांचे सर्व विवाद शांततापूर्ण द्विपक्षीय वाटाघाटीद्वारे सोडवतील.
ही पाच तत्त्वे काटेकोरपणे पाळली गेली तर, मला खात्री आहे की, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील छळलेल्या संबंधांसह दक्षिण आशियातील प्रादेशिक संबंधांना मैत्रीपूर्ण, सहकार्याच्या साच्यात पुनर्रचना करतील.’
जेव्हा गुजराल पंतप्रधान झाले तेव्हा हे संबंध अधिक सुधारले गेले. वर्ष 1998 मध्ये ते सर्व राजकीय पदांवरून निवृत्त झाले. 30 नोव्हेंबर 2012 रोजी वयाच्या 92 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.