पुणे – मुंबई-सोलापूर आणि मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या ट्रेनच्या प्रवाशांनी महिनाभरातच एक लाखाचा टप्पा ओलांडला आहे. यातून रेल्वे प्रशासनाला 8.60 कोटींचे उत्पन्न मिळाले आहे.
पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या हस्ते 11 फेब्रुवारी रोजी मुंबई-सोलापूर आणि मुंबई-शिर्डी या दोन वंदे भारत ट्रेनचे उद्घाटन करण्यात आले होते. यातील मुंबई ते सोलापूर ट्रेन ही पुणे मार्गे सोलापूरला जाते. पुण्यातून धावणारी ही पहिलीच वंदे भारत ट्रेन आहे. त्यामुळे पुणेकरांमध्ये ट्रेनविषयी उत्सुकता कायम आहे. या ट्रेनने जलद आणि आरामदायी प्रवास करता येत असल्याचे प्रवासी सांगत आहेत. मुंबई ते शिर्डी पेक्षा मुंबई ते सोलापूरला प्रवासाला पसंती दर्शवली असल्याचे आकडेवारी वरून स्पष्ट होते. दि. 11 फेब्रुवारी ते 14 मार्चदरम्यान मुंबई-सोलापूर आणि मुंबई-शिर्डी वंदे भारत ट्रेनमधून 1 लाख 259 प्रवाशांनी प्रवास केला आहे. याच कालावधीत 53 हजार 548 प्रवाशांनी मुंबई-सोलापूर-मुंबई मार्गावर, तर 46 हजार 711 प्रवाशांनी मुंबई-शिर्डी-मुंबई मार्गावर प्रवास केला.
मुंबई-सोलापूरला चांगला प्रतिसाद
मुंबई ते शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर वंदे भारत ट्रेनचे एकाच दिवशी उद्घाटन करण्यात आले. शिर्डी हे धार्मिक स्थळ असल्यामुळे नागरिकांचा याला चांगला प्रतिसाद मिळेल असी अपेक्षा होती पण, या ट्रेन पेक्षा पुणे ते सोलापूर ट्रेनला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे आकडेवारीवरून दिसते.