वडगाव मावळ (किशोर ढोरे) – मावळ तालुक्यातील 19 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक आणि 10 ग्रामपंचायतीच्या पोट निवडणुकीसाठी रविवारी (दि. 5) मतदान होणार आहे. त्यासाठी शुक्रवारी (दि. 3) सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावल्या. राजकीय नेत्यांना मराठा समाजाकडून असलेली गावबंदी हटल्यामुळे तालुक्यातील नेत्यांकडून गुप्त बैठका घेण्यावर जोर देण्यात आला आहे.
निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कोणत्याही मतदानाच्या 48 तास अगोदर प्रचार बंद करण्यात यतो. त्यामुळे शुक्रवारी (दि. 3) सायंकाळी पाच वाजता प्रचाराची मुदत संपली आहे. यामुळे गावांमधील उमेदवारांच्या प्रचारांचे पोस्टर काढून घेण्यात आलेले आहेत.
मराठा समाजाकडून राजकीय नेत्यांना गावबंदी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे तालुक्यातील अनेक राजकीय नेत्यांनी आपले गावनिहाय कार्यक्रम रद्द केल्याचे जाहीर केले. त्यामुळे गावातील नेत्यांनाच ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराची धुरा सांभाळावी लागत होती. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केल्याने आता तालुक्यातील नेत्यांनी ग्रामपंचायत निवडणूक असलेल्या गावांमध्ये घिरट्या घालण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे गुरूवारी (दि. 2) रात्रीपासूनच रात्रीच्यावेळी राजकीय नेत्यांकडून गुप्त बैठकांवर जोर देण्यात आला आहे. गावातील की वोटर यांच्या भेटीगाठीला उधाण आले आहे. एकीकडे या गुप्त बैठकांना जोर आला असताना दुसरीकडे प्रतिस्पर्धी उमेदवार, त्यांचे तालुक्यातील नेते आणि कार्यकर्त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचे काम सुरू झाले आहे.
जागा रहा रात्र वैऱ्याची आहे
अनेक उमेदवारांकडून निवडणुकीच्या आधी पैशांचे वाटप केले जाते. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी मतदान होईपर्यंत उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांना डोळ्यात तेल टाकून जागता पहारा ठेवावा लागणार आहे.
निवडणूक आयोगाचेही लक्ष
आदर्श आचार संहिता भंग होऊ नये यासाठी तहसीलल कार्यालयाकडून आचार संहिता कक्ष प्रमुख म्हणून अप्पर गट विकास अधिकारी प्रताप पाटील यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक गावांतील निवडणूक निर्णय अधिकारी यांना आचार संहिता भंग करणाऱ्यांवर कारवाई करता येणार आहे.
ग्रामपंचायत निवडणूक असलेल्या गावांमध्ये उमेदवार किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांकडून आदर्श आचार संहितेचा भंग होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तसेच कोणी पैसे देऊन किंवा दमदाटी आचार संहितेचा भंग करत असेल तर तत्काळ संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी किंवा माझ्याकडे तक्रार करावी. निवडणूक प्रक्रिया सुरक्षित व शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे.
– प्रताप पाटील, आचार संहिता कक्ष प्रमुख