चेन्नई – उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी आज पोलीस दलांना महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांशी संबंधित प्रकरणांमध्ये अधिक संवेदनशील राहण्याचे आवाहन केले. महिलांना संपूर्ण विकास आणि त्यांना त्यांची पूर्ण क्षमता साध्य करता यावी यासाठी सुरक्षित आणि सक्षम वातावरण निर्माण करणे खूप महत्वाचे आहे, असे उपराष्ट्रपती म्हणाले.
चेन्नई येथे आज तामिळनाडू पोलिसांना राष्ट्रपती पोलीस ध्वज प्रदान केल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांना उपराष्ट्रपती संबोधित करत होते.
देशातील सर्वात जास्त महिला पोलिस ठाण्यांची संख्या आणि देशातील दुसऱ्या क्रमांकाची महिला पोलिसांची संख्या असल्याबद्दल नायडू यांनी तामिळनाडू पोलिस दलाची प्रशंसा केली. आपल्या लोकसंख्येपैकी अर्धी लोकसंख्या स्त्रियांची आहे परंतु त्यांना विविध आघाड्यांवर समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी अजूनही बरेच काही करणे बाकी आहे, यावर त्यांनी भर दिला.
सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या घटना आणि ऑनलाइन फसवणूक तसेच सीमापार गुन्ह्यांसारख्या आधुनिक काळातील गुन्ह्यांवर चिंता व्यक्त करत उपराष्ट्रपतींनी 21 व्या शतकातील या गुन्ह्यांचा प्रभावी आणि जलदगतीने सामना करण्यासाठी आपल्या पोलीस दलांना कौशल्यपूर्ण आणि सुसज्ज करण्याचे आवाहन केले. सायबर गुन्ह्यांच्या प्रकरणांचा वैज्ञानिक धर्तीवर तपास करण्यासाठी विविध सायबर न्यायवैद्यक सुविधांसोबतच 46 सायबर गुन्हे पोलीस ठाण्यांसह स्वतंत्र सायबर गुन्हे शाखा स्थापन केल्याबद्दल त्यांनी तामिळनाडू पोलिस दलाचे कौतुक केले.