नवी दिल्ली – डिजिटल माध्यमातून पेमेंट करण्याची पद्धत भारतात लोकप्रिय होत आहे, त्यामुळे युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणजे यूपीआयच्या माध्यमातून व्यवहार वाढत आहेत, सप्टेंबर महिन्यामध्ये यूपीआयच्या माध्यमातून तब्बल 11 लाख कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याची आकडेवारी नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडियाने जाहीर केली आहे,
डिजिटल व्यवहाराला चालना मिळावी, नोटांचा वापर कमी व्हावा याकरिता यूपीआय 2016 मध्ये सुरू करण्यात आले होते. सप्टेंबर महिन्यात तब्बल 678 कोटी व्यवहार यूपीआयच्या माध्यमातून झाले. ऑगस्ट महिन्यात यूपीआयच्या माध्यमातून 658 कोटी व्यवहाराद्वारा 10.72 लाख कोटी रुपयांची देवाणघेवाण झाली होती. युपीआयच्या माध्यमातून ग्राहकांना मोबाईलद्वारे पेमेंट करता येते. तसेच यावर कसलाही आकार लावला जात नाही. त्यामुळे भारतामध्ये कॅशलेस व्यवहाराचे प्रमाण वेगाने वाढत आहे.
मध्यंतरी या व्यवहारावर काही प्रमाणात शुल्क लावले जावे का या विषयावर चर्चा होण्याची गरज आहे असे रिझर्व्ह बॅंकेने म्हटले होते. बऱ्याच बॅंकांनीही अनौपचारिक पातळीवर या विषयावर चर्चा होण्याची गरज व्यक्त केली होती. मात्र अर्थ मंत्रालयाने सध्या तरी या व्यवहारावर कसलेही शुल्क लावले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात दिवाळी आणि दसऱ्यावेळी यूपीआयच्या माध्यमातून व्यवहाराचा उच्चांक होण्याची शक्यता आहे. इतर व्यवहारामध्ये बरीच गुंतागुंत असते. त्यात त्याचबरोबर यामधून फसवेगिरी होण्याची शक्यता असते. त्या तुलनेत युपीआयचे व्यवहार सुरक्षित आहेत.त्याचबरोबर फसवेगिरी कमी होते त्यामुळे यूपीआय व्यवहार लोकप्रिय होत असल्याचे दिसून येत आहे.