लखीमपूर – मोदी सरकारने दिल्लीत वर्षभर धरणे धरून बसलेल्या शेतकऱ्यांना जी आश्वासने दिली होती ती आश्वासने त्या सरकारने अजून पूर्ण केलेली नाहीत, असा आरोप संयुक्त किसान मोर्चाने केला आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना शेतकरी मोर्चाचे नेते शिवकुमार शर्मा म्हणाले की, शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने पिकांसाठी किमान आधारभूत किंमत (एमएसपी) देण्यासह अनेक आश्वासने दिली होती; परंतु त्याची पूर्तता अद्याप झालेली नाही.
आंदोलकांवर दाखल केलेले सर्व खटले परत घेतले जातील, आंदोलनादरम्यान मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक भरपाई दिली जाईल, शेतकऱ्यांना वीज माफ करू, अशी आश्वासने देण्यात आली होती त्याला अद्यापपर्यंत तरी सरकारने हरताळच फासला आहे, असे शर्मा यांनी सांगितले.
शर्मा म्हणाले की, पंतप्रधानांनी 19 नोव्हेंबर 2021 रोजी एमएसपीसाठी एक समिती स्थापन केली जाईल, अशी घोषणा केली होती; परंतु अद्याप त्या समितीचाही पत्ता नाही.