लखीमपूर खेरी – देशात दुसरा किम जोंग निर्माण होता कामा नये याची काळजी मतदारांनी घेतली पाहिजे आणि त्यानुसार त्यांनी या निवडणुकीत सावधगिरीने मतदान केले पाहिजे, अशी सूचना शेतकरी नेते राकैश टिकैत यांनी भाजपवर टीका करताना केली आहे. किम जोंग हे उत्तर कोरियाचे हुकूमशहा आहेत त्यांनी आपल्या हुकूमशाही प्रवृत्तीने साऱ्या देशाला जेरीला आणले आहे त्या संदर्भात त्यांनी हे विधान केले आहे.
ते म्हणाले की, लोकांना समजून घेणारा, त्यांच्याशी लोकशाही पद्धतीने आचरण करणारा मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान देशात असला पाहिजे. आपल्या येथे दुसरा किम जोंग निर्माण करायचा नाही. आपल्याला उत्तर प्रदेशात किंवा देशात आता हुकूमशाही पद्धतीने काम करणारे राज्यकर्ते नको आहेत. त्यामुळे लोकांनी आता जबाबदारीनेच मतदान करण्याची गरज आहे.
टिकैत यांनी या निवडणूक प्रचाराच्या सभांमध्ये भाजपच्या विरोधात जोरदार प्रचार केला आहे. उत्तर प्रदेशाच्या निवडणुकीत हिंदुस्तान-पाकिस्तान किंवा मुसलमान हे प्रमुख मुद्दे नाहीत. रोजगार आणि महागाई हे येथील प्रमुख मुद्दे आहेत, त्यावर विद्यमान सरकारांनी बोलले पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.