नांदेड – राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल खातेवाटप जाहीर केले. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन हे खाते राहणार आहे. यावरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटावर टीका केली आहे.
“अजित पवार निधी देत नाहीत असे म्हणून 40 आमदार बाहेर पडले त्यांना अर्थ खाते मिळाले, म्हणजे जी सासू नको नको म्हटली तीच वाट्याला आली, त्यामुळे सगळ्याच सुनांची काय चलबिचल सुरू असेल. ही सगळी माणसं राजकीय नैतीकता हरवलेली माणसं आहेत. नैतिकतेचा कुठलाही आधार यांच्याकडे नाही. सत्तेसाठी कुठलीही तडजोड ही लोकं करू शकतात,” अशी प्रतिक्रिया नांदेडमध्ये पत्रकारांशी बोलताना सुषमा अंधारे यांनी दिली आहे.
“आमच्याकडून गेलेली चाळीस भावंडांनी राष्ट्रवादी सोबत गेल्याने आमचं हिंदुत्व धोक्यात येतं असे कारण सांगितले होते. मग आता यांचं हिंदुत्व कुठल्या खुंटीला टांगून ठेवले. असं कोणतं प्रोटेक्टीव कव्हर त्यांनी घातला की ज्यामुळे आता त्यांच्या हिंदुत्वाला काहीच धक्का लागत नाही.” असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला. यावेळी त्यांनी अजित पवार यांचेही कौतुक केले. अजित पवार यांचे अभिनंदन. दादांची प्रशासनावर चांगली पकड आहे. अर्थ आणि नियोजनाची त्यांना चांगली जाण आहे. यापूर्वीही ही खाती त्यांनी हाताळली आहेत. दादांसारख्या अनुभवी व्यक्तीकडे ही खाती गेली, ही आनंददायी बाब असल्याचे त्या म्हणाल्या.
अजित पवार यांना अर्थखातं दिल्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांचा हस्तक्षेप राहणार नाही अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली आहे. खातेवाटपाबाबत चर्चा करण्यासाठी अजित पवार एकटे दिल्लीला गेले, देवेंद्र फडणवीस त्यांच्यासोबत नव्हते. म्हणजेच भाजप देवेंद्र फडणवीस यांना साईड लाईन करत आहे. महाराष्ट्रातली देवेंद्र फडणीस यांच्या बद्दलची नकारात्मकतेची कीर्ती केंद्रापर्यंत पोहोचलेली दिसते, असा टोलाही सुषमा अंधारे यांनी लगावला.