नवी दिल्ली – लोक जनशक्ती पक्षावर (लोजप) ताबा मिळवण्यासाठी पशुपतीकुमार पारस आणि चिराग पासवान या काका-पुतण्यांमधील संघर्ष शिगेला पोहचला आहे. त्यातून पारस यांच्या नेतृत्वाखालील गटाने चिराग यांना पक्षाध्यक्ष पदावरून हटवले. तर, चिराग यांनी पारस यांच्यासह पाच बंडखोर खासदारांची पक्षातून हकालपट्टी केली.
चिराग यांच्यासह बिहारमध्ये सहा खासदार असणाऱ्या लोजपमध्ये सोमवारी फूट पडली. पारस यांच्यासह पाच खासदारांनी चिराग यांच्याविरोधात बंड पुकारून वेगळा गट स्थापन केला. आपल्या गटालाच लोजप म्हणून मान्यता मिळावी, असे पत्र बंडखोरांनी लोकसभेच्या सभापतींना दिले. त्यानंतर लोकसभा सचिवालयाने पारस यांना लोजपचे सभागृहातील नेते म्हणून मान्यता दिली.
त्या घडामोडींमुळे दिवंगत नेते रामविलास पासवान यांनी स्थापन केलेल्या पक्षात मोठा पेचप्रसंग उद्भवला आहे. आता पक्षावर ताबा मिळवण्यासाठी दोन्ही गटांकडूून शह-काटशहाचे राजकारण सुरू झाले आहे. दोन्ही गटांकडून पक्षावर दावा सांगितला जात असल्याने त्या विषयाचा चेंडू आता निवडणूक आयोगाच्या कोर्टात जाण्याची शक्यता आहे.
लोजपचे इतर खासदार एकवटल्याने चिराग संसदीय पक्षात एकाकी पडले आहेत. मात्र, पक्ष संघटनेतील बहुतांश पदाधिकारी आणि नेते चिराग यांच्या पाठिशी आहेत. चिराग यांना पक्षाध्यक्षपदी देण्यात आलेली बढती पारस यांना रूचलेली नव्हती. त्यातून काका-पुतण्या संघर्षाची ठिणगी पडल्याचे समजते. दरम्यान, लोजपमधील फुटीबाबत चिराग यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली.
माझ्या वडिलांनी स्थापन केलेला पक्ष आणि कुटूंबाला एकत्र ठेवण्यासाठी मी प्रयत्न केले. मात्र, मला यश आले नाही. पक्ष मातेसमान आहे. मातेशी विश्वासघात करू नये. लोकशाहीत जनतेला सर्वोच्च स्थान आहे. पक्षावर विश्वास ठेवणाऱ्यांचे मी आभार मानतो, असे त्यांनी ट्विटरवरून म्हटले.