नवी दिल्ली – मी हाजीपूर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवत आहे. काका पशुपती पारस यांनी निवडणूक लढवली तर त्यांचे स्वागत आहे. मी कोणत्याही आव्हानाला घाबरत नाही. त्यांच्यासोबत जे काही घडले त्याला मी जबाबदार नाही. पण या काका-पुतण्याच्या लढाईत पुतण्याच जिंकेल, हे मी नक्की सांगू शकतो, असे प्रतिपादन लोक जनशक्ती पक्षाचे चिराग पासवान यांनी केले आहे.
आगामी निवडणुकीत अनेक ठिकाणी एकाच घरातले सदस्य एकमेकांविरुद्ध लढताना दिसणार आहेत. त्यात बिहारमधील हाजीपूर मतदारसंघात चिराग पासवान हे त्यांचे काका पशुपती पारस यांच्याविरोधात लढणार आहेत. त्याविषयी चिराग पासवान बोलत होते.
बिहारमध्ये २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये जागा वाटून घेण्यात आल्या आहेत. भाजप १७ जागांवर तर जेडीयू १६ जागांवर निवडणूक लढवणार आहे. त्याचबरोबर चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाला (एलजेपी-आर) ५ जागा देण्यात आल्या आहेत. जीतन राम मांझी आणि उपेंद्र कुशवाह यांच्या पक्षाला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे.
त्याचबरोबर चिराग यांचे काका पशुपती पारस यांच्या पक्षाला एकही जागा देण्यात आलेली नाही. त्यानंतर नाराजी व्यक्त करत पशुपती पारस यांनी मंगळवारी मोदी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला. पशुपती पारस म्हणाले की, एनडीएने आपल्यावर अन्याय केला आहे. त्यामुळे आपण आता इंडिया आघाडीच्या संपर्कात असून हाजीपूरमधून निवडणूक लढवणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
चिराग पासवान म्हणाले, “माझ्या वडिलांची (रामविलास पासवान) अपूर्ण राहिलेली स्वप्ने मला पूर्ण करायची आहेत. मुलगा असल्याने त्यांचे शब्द माझ्यापेक्षा चांगले कोणीही समजू शकत नाही. माझे वडील नसल्यामुळे ती माझी जबाबदारी आहे.
काका पशुपती पारस यांच्याबद्दल विचारले असता चिराग पासवान म्हणाले, पक्ष आणि कुटुंबापासून वेगळे होण्याचा त्यांचा निर्णय होता. मला आई आणि भाऊ-बहीण आहेत. सर्वांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा. मी एकटा काहीही करू शकत नाही. काकांनीही अनेक वैयक्तिक आरोप माझ्यावर केले आहेत. पण ते वडीलधारे असल्याने मी त्यांच्याबद्दल कधीच काही बोललेलो नाही.
कुटुंबातील दरीबाबत चिराग पासवान सांगतात, नात्यांमध्ये दुरावा केव्हा झाला ते मला समजलेच नाही. मी काका पशुपती पारस यांना सांगायला गेलो होतो की, तुम्हाला लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष व्हायचे असेल, तर नक्कीच राहा. पार्टी आणि कुटुंब तुटू नये ही इच्छा होती. मी माझ्या लढ्यात गुंतून राहिलो. मला जागा मिळवायच्या होत्या. इतर सहकाऱ्यांसोबत काय चालले आहे याची मला चिंता नव्हती. जेव्हा तुम्ही मोठ्या ध्येयाकडे वाटचाल करता तेव्हा लहान “मुद्द्यांकडे लक्ष देऊ नये. परस्पर मतभेद विसरून ४०० जागा जिंकण्यासाठी सर्वांनी एकत्र काम केले पाहिजे