जालना : जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. या घटनेचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. तसेच या प्रकरणी विरोधकांकडून राज्य सरकारवर टीका केली जात आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांसह अनेक नेते जालन्यात जाऊन आंदोलकांना भेटले. यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनीही शनिवारी रात्री उशिरा जालन्यात जाऊन आंदोलक आणि जखमींची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
उद्धव ठाकरे म्हणाले, “चित्र एकदम विदारक आहे. आपला वैभवशाली महाराष्ट्र त्याची परंपरा आहे. ही परंरपरा सध्याचं बेकायदेशीर सरकार पायदळी तुडवत आहे. लोकांवर निर्घृणपणे हल्ला करण्यात आला. एका ताईचं डोकं केवढं फोडलं आहे. सुदैवाने ती वाचली. तिला रुग्णालयात आणायला रुग्णवाहिकाही नव्हती. तिचं डोकं फुटलं, नाक फुटलं. कुणाच्या डोक्यात छर्रा घुसला आहे. कुणाच्या चेहऱ्यावर मारहाण झाली आहे, छर्रा लागला आहे. हे कोणतं सरकार आहे?” असा प्रश्नही ठाकरे यांनी विचारला आहे.
उद्धव ठाकरे यांनी पुढे राज्यनाम्याची मागणीही केली ते माध्यमांशी बोलतांना म्हणाले, “सगळ्यांकडून माहिती मिळते आहे की, सगळं शांततेत सुरू असताना अचानक एक फोन आला आणि त्यानंतर कारवाई सुरू झाली. हा फोन कुणाचा होता त्याला शिक्षा झालीच पाहिजे. जेव्हा गोवारींवर असा हल्ला झाला होता, तेव्हा मुधकर पिचडांचा राजीनामा घेतला गेला होता. तसाच यावेळी गृहमंत्र्यांचा राजीनामा घेतला गेलाच पाहिजे. ही जनतेची भावना आहे आणि आमचीही तीच मागणी आहे.”असेही ते म्हणाले आहे.