मुंबई – खोक्यातून सरकार आणू शकाल संस्कार नाही, असा टोला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना लगावला आहे. माणसे विकली जाऊ शकतात पण संस्कार विकले जात नाही, असा टोलाही त्यांनी यावेळी बोलताना लगावला आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, तुमची संस्कृती, परंपरा जिवंत राहिली काय, टिकली किंवा नाही या पेक्षा खुर्ची टिकली पाहिजे, अशी राज्यकर्त्यांची भावना असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आपण ऐकत आहोत सरकारमधील काही मंत्री नाराज आहेत.
यातील एकही मंत्री तुमच्यावर होणाऱ्या अन्यायामुळे नाराज नाही. सेवेकरी हे संस्कार देणारी माणसं आहेत त्यांनी एकत्र होणे गरजेचे आहे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. तुमचे आशीर्वाद माझ्या पाठिशी आहे, याची मला खात्री पटली आहे.
कारण तुम्ही येतो म्हटल्यावर मला फोन आला आणि शिवाजी पार्कचा आपला दसरा मेळावा ही परंपरा कायम राहिली आहे. यामुळे मला आपले आशीर्वाद आहे हे स्पष्ट झाले, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.
तीर्थक्षेत्रातील सेवेकरी मंडळी आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल झाले होते. यावेळी त्यांनी पारंपारिक वेश पारिधान केल्याचे दिसून आले.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी खासदार विनायक राऊत हे देखील उपस्थित होते.
शिवतीर्थावरच दसरा मेळावा घेणार
मातोश्री येथे आज नंदीबैल घेऊन वासुदेवाच्या पोषाखात सेवेकरी उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी आले होते. त्यांच्या शिष्टमंडळाने उद्धव ठाकरे यांच्याकडे त्यांच्या मागण्यांचे निवेदन सादर केले. तसेच, उद्धव ठाकरे यांनीही त्यांच्याशी संवाद साधला.
यावेळी ते म्हणाले की, शिवाजी पार्क आणि दसरा मेळावा ही आपली परंपरा आहे. यावर्षीसुद्धा वाजत गाजत उत्साहाने शिवाजी पार्क म्हणजेच शिवतीर्थ येथे दसरा मेळावा होणार आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.