मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी नुकत्याच पार पडलेल्या गुढीपाडवा मेळाव्यात हिंदुत्वाचा नारा दिला. तसेच देशभरातील मशिदींवर असलेल्या भोंग्यांचा मुद्दा ऐरणीवर आणला. मात्र यामुळे राजकारण ढवळून निघालं. आता राज ठाकरे यांनी भोंग्यांच्या मुद्दावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सज्जड दम दिला आहे.
राज ठाकरे यांनी एक पत्र ट्विट केलं. त्यात ते म्हणाले की, राज्य सरकारला माझं एकच सांगणं आहे; सत्ता येत- जात असते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही. मुख्यमंत्र्यांना सुनावत राज ठाकरेंनी भोंग्याच्या मुद्दावर मनसे कार्यकर्त्यांच्या होणाऱ्या धरपकडीवर आक्रमक भूमिका घेतली आहे. आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, असा इशारा देखील राज ठाकरेंनी यावेळी दिला आहे.
राज ठाकरे पुढं म्हणाले की, भोंग्याच्या मुद्दावरून आठवडाभरात महाराष्ट्र सैनिकांची दडपणूक करण्यासाठी राज्य सरकार ज्या पद्धतीने पोलीस बळाचा वापर करत आहे ते पाहता मला प्रश्न पडलाय की, मशिदीमध्ये लपवून ठेवलेली शस्त्रास्त्रे आणि अतिरेकी शोधून काढण्यासाठी अशी ‘धरपकड मोहीम राज्य सरकारने किंवा पोलिसांनी कधी राबवली होती का?”
राज्य सरकारला माझं एकच सांगणं आहे;
आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका.
सत्ता येत- जात असते.
कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही.
उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही!@CMOMaharashtra pic.twitter.com/M0hpLg7sfP— Raj Thackeray (@RajThackeray) May 10, 2022
राज्य सरकार बेभान होऊन अंगात आल्यासारखं वागत आहे. आमचा संदीप देशपांडे आणि इतरही अनेक कार्यकर्त्यांना पोलीस असे काही शोधत आहेत. जणू ते पाकिस्तानातून आलेले अतिरेकी किंवा निजामाच्या हैद्राबाद संस्थानातले रझाकार आहेत. अर्थात, महाराष्ट्र सैनिकांविरोधात ही अत्याचारी, दमनकारी कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना कुणी दिलेत हे समस्त मराठीजन, तमाम हिंदूजन उघड्या डोळ्यांनी बघत आहेत. तब्बल 28 हजार महाराष्ट्र सैनिकांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या, हजारोंना तडीपार केलं आणि अनेकांना तुरुंगात डांबलं. राज्य सरकारला माझे एकच सांगणं आहे. आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सत्ता येत जात असते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही, असा इशारा राज यांनी पत्रकातून दिला.