मुंबई – मागील काही महिन्यांपासून प्रचंड उलथापालथी अनुभवणाऱ्या महाराष्ट्रातील राजकारणात 17 फेब्रुवारीला अत्यंत महत्वपूर्ण आणि निर्णायक घडामोड घडली. शिवसेनेवर हक्क कुणाचा, या कळीच्या मुद्द्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने अंतिम निर्णय दिला.
आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटावर खरी शिवसेना म्हणून शिक्कामोर्तब केले. तसेच, धनुष्यबाण हे चिन्हही शिंदे गटाला बहाल केले. शिंदे गटासाठी निवडणूक आयोगाचा निर्णय अतिशय सुखावणारा आहे. त्याउलट, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाच्या दृष्टीने हा निर्णय अतिशय धक्कादायक आहे.
स्थापनेपासून शिवसेना म्हणजेच ठाकरे असे समीकरण होते. मात्र, यापुढे शिवसेना हा शिंदेंचा पक्ष म्हणून ओळखला जाणार आहे. 1989 मध्ये शिवसेनेला अधिकृतरित्या धनुष्यबाण हे चिन्ह मिळालं. तेव्हापासून शिवसेनेच्या राजकीय कारकीर्दीत धनुष्यबाण चिन्हाचं महत्त्व अधिक वाढत गेलं. आता हेच चिन्ह आणि नाव एकनाथ शिंदे यांना देण्यात आलं आहे.
दरम्यान, आता हाच धागा पकडून कालिचरण महाराज यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. “उद्धव ठाकरे यांनी हिंदुंचा विश्वासघात केला. त्याचमुळे त्यांच्या हातून पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह गेल्याचं, कालिचरण महाराज यांनी म्हटलं आहे. या संदर्भातील त्यांचा एक व्हिडिओ देखील सगळीकडे व्हायरल झाला आहे.
ते आपल्या व्हिडिओत म्हणत आहे की, “उद्धव ठाकरे सत्तेसाठी इटालियन बारबालाच्या पायाशी लोळण घेतलं. हिंदू विरोधी विचारांच्या लोकांशी हात मिळवणी केली. स्वत: च्या तत्वांना पायाखाली चिरडलं. सत्यानाश करून घेतला. त्याचमुळे त्यांच्या हातून पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह गेलं. आता निवडणुकीत त्यांनी काही करून दाखवावं. सगळे हिंदू आपल्या विश्वास घाताचा बदला घेतील.” असं विधान कालिचरण महाराजांनी केलं आहे.