पवनानगर –पवना धरण परिसरात फिरायला आलेल्या मुंबईतील दोन पर्यटकांचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एक अल्पवयीन मुलीचा समावेश आहे. ही घटना आज शुक्रवार (दि. 2) रोजी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास पवना धरण परिसरात फांगणे येथे घडली.आर्या दीपक जैन (वय 13) व समीर कुलदीप सक्सेना (वय 43, दोघे रा. मुंबई) अशी बुडून मृत्यू झालेल्या पर्यटकांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवना धरण परिसरात एका कुटुंबातील 4 सदस्य, त्यांच्या लहान मुलांचे शाळेतील 3 मित्र व घरातील एक कामगार असे एकूण आठ जण फिरण्यासाठी पवना धरण परिसरात आले होते. यापैकी एक कामगार वगळता सर्वजण पाण्यात उतरले होते. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात उतरलेले सातजण बुडू लागले. हे लक्षात येताच बाहेर असलेल्या कामगाराने आरडाओरडा केला.
त्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. पोलिसांना संपर्क केला. सदर घटनेचे गांभीर्य ओळखत पोलीस देखील अवघ्या काही क्षणात घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थ व लोणावळा ग्रामीण पोलीस ांनी बुडालेल्यांपैकी पाच जणांना सुखरूप बाहेर काढले. मात्र त्यापैकी दोन जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिस हवालदार विजय गाले, रफिक शेख पुढील तपास करत आहे.
पवना धरण परिसरात येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे;परंतु पर्यटकांच्या निष्काळजीपणामुळे अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. पाण्यात उतरु नय, अशा आशयाचे सूचना फलक ठिकठिकाणी लावले आहेत. पाण्यात उतरणे, सेल्फीच्या नादात धोकादायकठिकाणी जाणे, वाहन वेगाने चालवणे आदी घटना घडत आहेत. स्थानिकांना मज्जाव केला तर त्याच्याशीच अनेक पर्यटकांनी वाद घातल्याच्या घटना देखील परिसरात यापुर्वी घडल्या आहेत.