पुणे : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत (PM Kisan Samman Nidhi Yojna) अद्याप जिल्ह्यातील 1 लाख 59 हजार 863 शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रमाणीकरण प्रलंबित आहे. पोर्टलवरील नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांची ई-केवायसी करण्यासाठी 7 सप्टेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून या मुदतीत प्रमाणीकरण करुन घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्याना ई-केवायसी करण्यासाठी ओटीपी किंवा बायोमेट्रीक हे पर्याय उपलब्ध करुन दिले आहेत. योजनेच्या लाभासाठी सर्व पात्र शेतकऱ्यांनी वेळेत ई-केवायसी करणे बंधनकारक आहे.
जिल्ह्यात आजअखेर एकूण 4 लाख 98 हजार 278 शेतकऱ्यांपैकी 3 लाख 38 हजार 415 शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रमाणीकरण पूर्ण केलेले आहे. उर्वरीत 1 लाख 59 हजार 863 लाभार्थ्यांचे ई-केवायसी प्रमाणीकरण प्रलंबित आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने दिली आहे.