कात्रज : कात्रजलगत घाट भिलारेवाडी परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून दोन बिबट्यांचा वावर असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. रविवारी एका पाळीव कुत्र्याला घराच्या दारातून येऊन फस्त केले. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. संभाजी धनावडे यांच्या घरासमोरील पाळीव कुत्र्याला ठार करून जंगलामध्ये फरफटत नेल्याचे तसेच 10-12 दिवसांपासून बिबट्या परिसरात फिरत असल्याचे आढळून आले.
वनविभागाच्या गट नंबर 10 या जागेमध्ये बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. वनविभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी परिसरात पाहणी करून माहिती गोळा केली आहे. घाट परिसरामध्ये दोन बिबटे आहेत, आतापर्यंत तरी त्यांनी नागरिकांवर हल्ला केलेले नाहीत. परंतु, नागरिकांनी खबरदारी म्हणून संध्याकाळी व सकाळच्या वेळी वनविभाग हद्दीत जाण्याचे टाळावे. लहान मुलांना घराबाहेर सोडू नये, असेही आवाहन वनपाल विशाल यादव, वनरक्षक संभाजी गायकवाड, वनसेवक संभाजी धनावडे यांनी केले आहे.
दक्षिण उपनगर परिसरालगत सुमारे 715 हेक्टर जंगल क्षेत्र असून यामध्ये खोकड, माकड, वानर, मोर, साळिंदर, कोल्हा, ससे व अन्य सरीसृप असे विविध प्राणी आढळतात. वाढत्या नागरीकरणामुळे व डोंगर भागामध्ये मोठ्या प्रमाणात घरे बांधण्यात आल्याने वन्य प्राण्यांचा वापर अशा ठिकाणी वाढला आहे. कात्रज घाट परिसरामध्ये रात्रीच्या वेळी काही नागरिक कचरा टाकण्यास येतात, या कचऱ्यावर शहरी मोकाट डुकरे फिरतात. त्यामुळेही बिबट्या वनक्षेत्र सोडून रस्त्यावर पर्यायाने लगतच्या परिसरात येत आहेत.
वनक्षेत्रामध्ये दोन बिबट्यांचा वावर आहे. वनक्षेत्रालगत नागरीकरण वाढल्याने वन्य प्राणी नागरी वस्तीत येत आहेत. नागरिकांनी खबरदारी म्हणून संध्याकाळी व सकाळच्या वेळी वनपरिक्षेत्रामध्ये फिरू नये. तसेच लहान मुलांनादेखील एकटे बाहेर सोडून नये.
– विशाल यादव, वनपाल, खेड शिवापूर