कराड -राज्य शासनाच्या महसुलाचे प्रमुख स्त्र्रोत असणाऱ्या मद्यविक्रीस आजपासून (बुधवार, दि. 13) परवानगी मिळाली. शासनाच्या या निर्णयाचे तळीरामांमधून स्वागत करण्यात येत आहेत. दि. 18 पासून पुन्हा पुढील लॉकडाऊन वाढण्याची शक्यता असल्याने तसेच गेली दीड ते दोन महिने दारूविक्रीस बंदी असल्याने सकाळपासूनच वॉईन शॉपसमोर तळीरामांनी गर्दी केली होती. मद्यविक्री दुकानांसमोर सुमारे दोन किलोमीटरच्या रांगा लागलेल्या दिसत होत्या. या निर्णयामुळे अनेक कुटूंबांना आर्थिक चणचण भासण्याची शक्यता असल्याने सामाजिक संघटनांनी विरोध दर्शविला आहे.
करोना महामारीमुळे गेली दीड ते दोन महिने सर्वत्र लॉकडाऊनची परिस्थिती आहे. सर्व व्यवहार ठप्प आहेत. शासनाला सर्वात जास्त महसूल मिळवून देणारी दारू दुकानेही बंद आहेत. त्यामुळे शासनाच्या तिजोरीत खडखडाट निर्माण होऊ लागला आहे. लॉकडाऊनमुळे घरी असणाऱ्या तळीरामांमधून दुकाने बंद असल्याने नाराजी व्यक्त होत होती. अनेकजण चोरून दारू मिळतेय का याची खातरजमा करत होते. त्याचा काहींनी मात्र, चांगलाच लाभ उठवला. 50 रूपयांची दारूची बाटली 250 रूपयांना विकली जात होती. परंतु, दारूची चटक लागलेल्यांनी त्या दराने खरेदीही केली. एकीकडे व्यवसाय बंद असल्याने अनेक कुटुंबांना आर्थिक चणचण भासत होती. तर दुसरीकडे दारूची सवय असणाऱ्यांनी मिळेल त्या दराने दारू खरेदी केली. यात अनेकांनी आपले हात धुऊन घेत काळी माया जमा केली.
सध्या शासनाच्या तिजोरीत खडखडाट जाणवू लागल्याने महसुलाचे आर्थिक स्त्रोत असणाऱ्या मद्यविक्रीस परवानगी दिली. त्यामुळे सर्व तळीरामांनी आनंद व्यक्त केला. गेल्या दीड महिन्यापासून कोरडे पडलेले घसे आता खऱ्या अर्थाने ओले होतील अशाही काहींनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. बुधवारी सकाळपासूनच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत अनेकांनी वाईन शॉप दुकानांसमोर रांगा लावलेल्या होत्या. त्यामध्ये कराड शहरातील पंकज, संगमसह इतर दुकानांसमोर मोठ्या रांगा लागल्या होत्या. इतरवेळी स्वस्त धान्य वा किराणा दुकानांसमोर खरेदी करताना प्रचंड ऊन्हाचे कारण सांगणारे महाभाग मद्यखरेदीसाठी मात्र भर ऊन्हात उभे राहिलेले दिसत होते.
सोमवार, दि. 18 नंतर लॉकडाऊन वाढण्याची शक्यता असल्याने अनेकांनी पुढील पंधरा ते वीस दिवस पुरेल इतका स्टॉक खरेदी केला. त्यामुळे वाईन शॉप दुकानांनाही एका दिवसात चांगला फायदा झाला. पुढील लॉकडाऊन वाढण्यासाठी आणखी चार ते पाच दिवस असल्याने मद्यविक्री दुकानांसमोरील गर्दी काही कमी झालेली दिसणार नाही, हे निश्चित.
महसूल वाढविण्यासाठी शासनाने जरी हा निर्णय घेतला असला तरी अनेकांना त्याचा फटका बसणार आहे. गेली दोन महिने कामधंदा बंद असल्याने अर्थाजन चालविण्यासाठी जपून ठेवलेले पैसेही दारूसाठी उडविले जाण्याची शक्यता आहे. शिवाय संबंधित कुटूंबातील व्यक्तींना मानसिक त्रासालाही सामोरे जावे लागणार आहे. सध्याच्या परिस्थितीत खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे असताना शासनाने मद्यविक्रीस परवानगी दिल्याने त्याचा मोठा फटका अनेक कुटूंबांना बसणार आहे. त्यामुळे मद्यविक्रीस दिलेली परवानगी शासनाने रद्द करण्याची मागणी होत आहे.