इंदापूर – राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची वीज तोडणी मोहीम बंद करून, कृषीपंपांचा वीज पुरवठा तात्काळ चालू करावा, अन्यथा पुन्हा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शनिवारी (दि. 12) दिला आहे.
इंदापूर येथे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली नुकतेच भाजपच्या वतीने कृषीपंपाचा वीज पुरवठा सुरू करण्यात यावा, या मागणीसाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्या उपस्थितीत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मोबाइलद्वारे आंदोलकांशी संवाद साधत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला होता.
या आंदोलनप्रसंगी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दोन दिवसात सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन हर्षवर्धन पाटील व मान्यवरांना दिले होते. मात्र चार दिवस झाले तर वीज पुरवठा पूर्ववत केलेला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांची चेष्टा करू नका, शांत असलेल्या शेतकऱ्यांचा उद्रेक होऊ देऊ नका, असा इशाराही यावेळी पाटील यांनी दिला आहे.
सध्या मुबलक पाणी आहे; पण वीज तोडणीमुळे शेतातील उभी पिके जळून चालल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम महाविकास आघाडी सरकार करीत आहे. तालुक्याचे लोकप्रतिनिधी असलेले राज्यमंत्री हे शेतकऱ्यांच्या वीज तोडणीबाबत गप्प आहेत, अशी टीकाही पाटील यांनी केली. शेतकऱ्यांना महावितरणकडून आलेली बिले दुरुस्त करणे व दुरुस्तीचे बिल भरण्यासाठी शेतकऱ्यांना हप्ते पाडून देणे गरजेचे आहे, असे पाटील यांनी नमूद केले.