मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचा आज वाढदिवस. त्यानिमित्ताने मुंबईत अभिष्टचिंतन सोहळ्याचं आयोजन कऱण्यात आलं होतं. या सोहळ्यात उपस्थितांनी शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीचं भरभरून कौतुक केलं. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
पवार साहेबांचा वाढदिवस म्हणजे महाराष्ट्राच्या जाणत्या नेत्याचा वाढदिवस. शेतकरी, कामगार, वंचित, आदिवासी अल्पसंख्याक अशा सर्व घटकातील बांधवांसाठी निर्णय घेणाऱ्या नेत्याचा वाढदिवस. गेले ६० हून अधिक वर्ष राज्याच्या प्रगतीसाठी काम करणाऱ्या कर्मयोग्याचा वाढदिवस. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुटुंबप्रमुखाचा वाढदिवस साजरा करत असताना पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने झोकून देऊन काम करावे. पवार साहेबांचे विचार प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन अजित पवार यांनी केलं.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले की, प्रत्येकाने पहिल्या शनिवारी आपल्या गावात जाऊन बसून चर्चा करायची. एक अतिशय चांगला उपक्रम त्यांनी सांगितला. मात्र जे लोक आपल्या गावात जातील त्यांनी त्या गावचा सरपंच आपल्या विचारांचा असेल एवढा तरी प्रयत्न करावा, अशी सूचना अजित पवारांनी केली.
पवार साहेबांचे राजकारण आणि समाजकारणाबाबत अनेकजण चर्चा करतात. अनेक लोक विश्लेषण करतात. राज्याचे सामाजिक, सांस्कृतिक किंवा कुठलेही क्षेत्र असले तरी प्रत्येक क्षेत्रावर साहेबांच्या विचारांचा ठसा आहे. साहेबांची नोंद घेतल्याशिवाय राज्याचा, देशाचा इतिहास लिहिता येणार नाही, हे पवार साहेबांचे मोठेपण आहे. साहेबांच्या व्यक्तिमत्त्वाला हिमालयाची उंची आणि सह्याद्रीचा भक्कमपणा लाभला आहे. त्यांचा राजकारणातला मुत्सद्दीपणा, विकासाची दूरदृष्टी, अहोरात्र कष्ट करण्याचा स्वभाव, राजकारणासोबतच इतर क्षेत्रातील सहज वावर अशा अनेक गोष्टी आपण पाहिल्याचं अजित पवारांनी म्हटलं.
सर्वांकडे बारकाईने लक्ष देणे, सर्वांना संस्कार देणे, सामाजिक जाणीव देणे, सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी प्रोत्साहन देणे, हे साहेब निरंतर करत असतात. केवळ आम्हालाच नाही तर राज्यातल्या लाखो युवकांना साहेबांनी ताकद, बळ दिले. त्यामुळेच तुमच्या-माझ्यासारखे लोक साहेबांकडे आधारवड म्हणून पाहतात, असंही अजित पवार म्हणाले.