पवारांची विदेश व्यवहार मंत्रालयाकडे मागणी
मुंबई : करोना विषाणुंच्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर अनेक भारतीय नागरीक इराण मध्ये अडकून पडले आहेत त्यांना तेथून बाहेर काढण्यासाठी विदेश व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी प्रयत्न करावेत असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांनी केले आहे.
पवार यांनी आज आपल्या ट्विटर अकौंटवर म्हटले आहे की इराणच्या कोम शहरात 40 भारतीय नागरीक अडकून पडले असून तेथील नागरीकांना बाहेर प्रवास करण्यास बंदी घालण्यात आल्याने त्यांची अडचण झाली आहे.
त्यांना वैद्यकीय तसेच अन्य मदतीचीही गरज आहे. ती त्यांना पुरवण्याच्या संबंधात मदत करावी अशी विनंती आपण विदेश व्यवहार मंत्री जयशंकर यांना केली आहे. इराण मध्ये करोना विषाणुंचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाला असून तेथे या रोगाने 194 जणांचे बळी गेले आहेत.
तसेच त्या देशात 6566 लोकांना या रोगाची लागण झाल्याने तेथे नागरीकांच्या वावरावर मोठ्या प्रमाणात निर्बंध लागू करण्यात आले आहेत.