उत्तम पिंगळे
काल प्राध्यापकांच्या घरी गेलो तर प्राध्यापक वेगळ्याच मूडमध्ये होते. मला गेल्यागेल्याच म्हणाले, काय हो आपणास टीआरपी म्हणजे काय हे माहीत आहे का? मी थोडे अडखळतच म्हणालो, हो. म्हणजे टीव्हीवर कोणता कार्यक्रम जास्त बघितला जातो ते समजते वगैरे. यावर प्राध्यापक म्हणाले, बरोबर आहे. टीआरपी म्हणजे टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट. यामध्ये एक सर्व्हे घेतला जातो त्यात वेगवेगळ्या स्तराचे लोक, वेगळ्या भागात असलेले, वेगवेगळे उत्पन्न गट असलेले, वेगवेगळे जाती धर्माचे तसेच शैक्षणिक पातळीच्या लोकांचे एक सॅम्पल बनवले जाते. त्यांच्या टीव्हीला एक उपकरण लावले जाते ज्यायोगे त्या कुटुंबाने त्या दिलेल्या कालावधीत कोणकोणते कार्यक्रम पाहिले ते समजू शकते.
आता आपल्याकडे एक तर भरमसाठ टीव्ही चॅनल्स आहेत त्यामुळे त्यांनाही समजणे आवश्यक आहे की लोक कोणकोणते कार्यक्रम पाहात आहेत. त्याप्रमाणे तेही आपल्या कार्यक्रमांची आखणी करू शकतात. त्याप्रमाणे त्यांना जाहिरातींचे उत्पन्न मिळते. कंपन्याही आपल्या जाहिराती ज्या कार्यक्रमाचा टीआरपी जास्त त्याच चॅनल्सना देतात ज्यायोगे त्या जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचू शकतात.आणि इथंच खरी मेख आहे. त्यामुळे जे ते चॅनल आपला टीआरपी कसा वाढेल याकडे लक्ष देत आहेत. याच जीवघेण्या स्पर्धेमुळे टीआरपी वाढवण्याकरता चॅनल्स कोणत्याही स्तरावर जात आहेत.
आताचे उदाहरण घ्या, पंतप्रधान गंगा घाटावर कानपूर येथे एका पायरीवर अडखळले व जवळजवळ पडले. झालं कित्येक माध्यमांनी ते दाखवले. यूट्यूबवरील तो व्हिडिओ अनेक माध्यमांमध्ये आता व्हायरल झाला आहे. खरे तर अशी गोष्ट दाखवू नये. पण आपला टीआरपी वाढला पाहिजे ना मग काय! यामध्ये दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे महिलांच्या बाबतीत आहे. कित्येक वेळेला मॉडेल्स किंवा कलाकार, खेळाडू अशा सिलेब्रिटींबाबत कपड्यांच्याबाबतीत झालेली गडबड दाखवली जाते. कित्येक वेळेला फॅशन शोमध्ये कधी कधी गडबड होते. याचेही भांडवल केले जाते. दुसरे म्हणजे एखाद्या हुशार विद्यार्थ्याने आत्महत्या केली, वा अतिरेक्यांच्या हल्ल्यात जवानांची तुकडी जायबंदी झाली त्यातील काही जवान शहीद झाले किंवा एखाद्या सिलेब्रिटीचा मृत्यू अशा प्रसंगी हे चॅनेल्सवाले थेट त्यांच्या घरी जाऊन त्यांना नको ते प्रश्न विचारत असतात. एक तर त्यांची जिवाभावाची व्यक्ती गेलेली असते व तुम्ही त्यास अजून परेशान करत असता. वेळ कोणती, प्रसंग कोणता याचे काही तारतम्य नाही. गुन्हेगाराला जामीन मिळाला व तो तरुंगातून बाहेर येत असताना दाखवले जाते. तोही निर्लज्जपणे “व्ही’ असा हात दाखवतो. लोकांना यातून एक संदेश जातो की येथे गरिबांना कोणत्याही प्रकारचा न्याय नसून तो केवळ विशिष्ट लोकांसाठीच आहे.
अशा प्रकारचे विविध प्रसंग हे खरे सार्वजनिक होऊ नये परंतु केवळ टीआरपी वाढवण्याकरता दाखवले जातात. कित्येकदा पत्रकार आपला जीवही धोक्यात घालून अतिरेक्यांवरील कारवाई, नैसर्गिक संकट, आग यांचेही प्रत्यक्ष चित्रीकरण करत असतात व लोकांपर्यंत पोहोचवत असतात. पण हेही केवळ टीआरपी वाढवण्या करताच. एकूणच टीआरपीने विधीनिषेधशून्य असे व्यापारयुद्ध अनेक माध्यमांत लावले आहे हे बाकी खरे.