पुणे – वर्षभर एकमेकांवर टीका टीपण्णी करणारे सर्व पक्षाचे नेते दिवाळीत वाडेश्वर कट्ट्यावर एकत्र येऊन फराळ करतात. गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा सुरु आहे. या फराळ कार्यक्रमावर सामाजीक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी टीका केली आहे. माजी आमदाराचे निधन होऊन 24 तासही न उलटता नेत्यांनी फराळावर ताव मारला, हे राजकारणी लोक इतके निर्लज्ज कसे काय असू शकतात, अशी टीका देसाई यांनी केली आहे.
तृप्ती देसाई यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘आज वाडेश्वर कट्ट्यावर सर्वपक्षीय राजकीय लोकप्रतिनिधींसाठी सकाळी फराळ आयोजित करण्यात आला होता, खरंतर हा कार्यक्रम पुढे ढकलता आला असता. कालच पुण्यात पंधरा वर्षे आमदार असलेले विनायक आबा निम्हण यांचे अचानक निधन झाले, त्यांना जाऊन 24 तास पण झालेले नाहीत. आज फराळ करताना, पदार्थांवर ताव मारताना वाडेश्वर कट्ट्यावर दिसलेले आबांचे हे सर्वच सहकारी आणि जवळचे मित्र परंतु एन्जॉय करताना दिसले. कदाचित कट्ट्यावर श्रद्धांजली ही यांनी वाहिली असेल परंतु त्यांना दिलेला अग्नी अजूनही शांत झालेला नसताना हे जे सर्व झाले त्याचा निषेधच आहे. आबांवर जी वेळ आली ती सर्वांवरच एक दिवस येणार आहे परंतु राजकारणी इतके निर्लज्ज कसे काय असू शकतात हाच मोठा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्तीला पडलेला आहे’, असं त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे.
दरम्यान, पुण्यातील शिवाजीनगर मतदार संघाचे माजी आमदार विनायक निम्हण यांचे बुधवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले होते. विनायक निम्हण हे शिवाजीनगरचे 1999 ते 2014 पर्यंत आमदार होते. पहिल्या दोन वेळा ते शिवसेनेकडून तर अखेरच्या टर्ममध्ये काँग्रेसकडून आमदार म्हणून निवडून आले होते.