नवी दिल्ली – भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) येत्या कोही दिवसांत ऑलिम्पिकला पात्र ठरलेल्या व पात्रतेची संधी असलेल्या खेळाडूंचे प्रशिक्षण व सराव शिबिर सुरू करण्याच्या तयारीत आहे. अर्थात, त्यासाठी देशातील विविध खेळांच्या क्रीडा संघटनांकडे त्यांचे मत मागितले आहे.
करोनामुळे मार्च महिन्यापासून निवासी खेळाडू वगळता अन्य खेळाडूंचा सांघिक तसेच वैयक्तिक सराव बंद करण्यात आला होता. करोनाचा धोका वाढत असताना देशातील सर्व स्पर्धा स्थगित केल्या होत्या, तर काही स्पर्धा लांबणीवर टाकल्या गेल्या होत्या. या स्पर्धा तर इतक्यात सुरू होणार नसल्याचे साईकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ज्या खेळांना वैयक्तिक सराव व स्पर्धा खेळण्याचा निकष असतो त्या खेळातील खेळाडूंचा सराव सुरू करण्यावर भर देण्यात येणार आहे. मात्र, प्रतिस्पर्धी खेळाडू एकमेकांना स्पर्श होईल अशा खेळांना या सरावात स्थान देण्यार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
अर्थात, यापूर्वी संबंधित क्रीडा संघटनांची मते मागवण्यात आली असून ही शिबिरे ज्या ठिकाणी आयोजित करण्यात येतील ती परिस्थिती तसेच तेथील आरोग्य अधिकारी, महापौर, आयुक्त तसेच संबंधित सर्व घटकांनी परवानगी दिली तरच हे शिबिर घेण्यात येणार आहे.