नवी दिल्ली: करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पाकिस्तानातून सीमेवरून होणारी वाहतूक तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. आरोग्य विभाग आणि अन्य संबंधितांशी चर्चा केल्यानंतर याबाबतचा पुढील निर्णय घेतला जाणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.
करतारपूर कोरिडोर 29 जूनला पुन्हा खुला करून पाकिस्तानकडून सद्भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासाठीचा निर्णय पाकिस्तानकडून दोन दिवस आगोदरच जाहीर केला गेलेला आहे. मात्र द्विपक्षीय करारानुसार किमान 7 दिवस आगोदर निर्णय जाहीर करणे आवश्यक आहे. त्या अवधीत भारताकडून प्रवाशांची नोंदणीची प्रक्रिया सुरू केली जाऊ शकली असती.
याशिवाय पूर्वी घेतलेल्या निर्णयानुसार पाकिस्तानने रावी नदीवर पाकिस्तानच्या बाजूने पूल बांधणे आवश्यक होते. मात्र त्या पुलाचे बांधकामही पाकिस्तानने केलेले नाही. पावसाळ्याला सुरुवात होत असल्यामुळे यात्रेकरूंच्या सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने हा पूल बांधणे आवश्यक आहे. त्यामुळे भारतीय यात्रेकरूंना या कोरिडोरवरून प्रवासाला पाठवायचे की नाही,याबाबत निर्णय घ्यावा लागणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.
जगभरातील प्रार्थनास्थळे आता भाविकांसाठी उघडली जाऊ लागली आहेत. त्यामुळे सर्व शीख भाविकांसाठी पाकिस्तान करतारपूर कोरिडोर खुला करत आहे, महाराजा रणजीत सिंह यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने हा कोरिडोर खुला केला जाणार आहे, असे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी म्हटले आहे.