आळंदी – आळंदीमध्ये नुकताच संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा पार पडला. त्यानंतर दि. 14, 15, 16, 17 डिसेंबर रोजी सलग चार दिवस आळंदीकरांसह आळंदीतून ये-जा करणार्या वाहनचालकांना बेशिस्त पार्किंगचा त्रास सहन करावा लागत आहे. आळंदीतील सर्वच मार्गांवर अनधिकृत पार्किंग, अतिक्रमण यामुळे वाहनांच्या लांबलचक रांगा लागत आहेत. यावर उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
प्रदक्षिणा रस्ता, वडगाव रस्ता, मरकळ रस्ता इ. ठिकाणी रस्त्यावर दुतर्फा दुचाकी, चारचाकी वाहने बेशिस्तपणे पार्क केली जात आहेत. त्यात भर म्हणून अवजड वाहने सुद्धा बंदीच्या वेळेत शहरात प्रवेश करत असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. अवजड वाहनांना सकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत शहरात येण्यास बंदी आहे.
या नियमांचे पालन करताना ते दिसून येत नाहीत. तसेच काल एका आळंदीतील सोशल मीडिया ग्रुप वर आळंदीतील वाहतूक कोंडी समस्येबाबत चर्चा रंगली होती. पर्यायी अनेक रस्ते झाले असून सुद्धा त्यासंबंधीची माहिती बाहेरील येणार्या वाहनचालकांना नसल्यामुळे अडचण निर्माण होत आहे. पर्यायी रस्त्याचे फलक देखील नाहीत. रस्त्याचे नामनिर्देशित फलक लावणे गरजेचे आहे. असे मत संकेत वाघमारे यांनी मांडले.
वर्तुळाकार वाहतूक करणे, शक्य तिथे लहान पर्यायी रस्ते, बायपास आणि रस्त्यावर उभी राहणारी वाहने यांचा बंदोबस्तासाठी उपाययोजना आणि पदपथ रिकामे असणे गरजेचे आहे. आळंदीतील वाहतूक कोंडी संबंधी काहीतरी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.
-हेमंत गावडे पाटील, आळंदीकर