पुणे -चांदणी चौकातील वाहतूक कोंडी सुटता सुटेना. मंगळवारीही चौकात कोंडीमुळे वाहनांच्या दोन किलोमिटरपर्यंत रांग गेल्या होत्या. त्यामध्ये मुख्य महामार्गासह मुळशीकडून येणारा उड्डाणपुल आणि बावधनच्या दिशेने येणारी वाहने कोंडीत अडकली आणि लांबपर्यंत रांगा गेल्या.
सुटसुटीत, सुरक्षित, विना अडथळा आणि वाहतूक कोंडीपासून कायमची सुटका हवी म्हटल्यावर सध्या चांदणी चौकात सुरू असलेल्या कामाचा त्रास सहन करावा लागणारच. मात्र, सध्या चौकातील 90 टक्के काम पूर्ण झाले असेल, तर कोंडीही 50 टक्के सुटणे अपेक्षीत असताना, दररोज संध्याकाळी “पीक अवर’मध्ये होणारी कोंडी नित्याचीच आहे. त्यामुळे या कोंडीतून सुटका कधी होणार? अजून किती महिने कोंडीचा त्रास सहन करावा लागणार? असा प्रश्न वाहनचालक उपस्थित करत आहे.
बुधवारी (दि. 19) सायंकाळी मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वाहनांच्या दोन ते अडीच किलोमिटर लांबपर्यंत रांगा गेल्या होत्या. त्यामुळे मुळशीकडून आणि बावधनकडून येणाऱ्या रस्त्यावरही वाहतूक कोंडी झाली होती. ही कोंडी सोडविताना वाहतूक पोलिसांची चांगलीच दमछाक होत आहे.
दरम्यान, पुढील दोन ते तीन महिने या कोंडीला सामोरे जावे लागणार असून, काम पूर्ण झाल्यावर वाहनचालकांना कोंडीतून दिलासा मिळणार की, परिस्थिती “जैसे थे’ राहणार हे लवकरच स्पष्ट होईल.
कोंडी का होते…?
मुंबई, मुळशी आणि बावधन या तीनही बाजूने येणारी वाहतूक जवळपास सात ते आठ लेनमधून येते. ही सर्व वाहने चांदणी चौकातून पुढे चार लेनमधून जात असल्याने चौकात कोंडी होते. आणि त्याचा फुगवटा महामार्गावर दोन ते तीन किलोमिटर लांबपर्यंत पोहोचतो. त्यातच महामार्गावरून बावधनला जाणारी वाहने डाव्या बाजूला वळतात, तर चौकातील थांबा आणि उड्डाणपुलाच्या कामामुळे कोंडीत आणखीन भर पडत आहे.