राजगुरूनगर -शहरात संपूर्ण वाहन बंदी केली असतानाही नागरिकांनी रस्त्यावर येऊन गर्दी केली. खबरदारी म्हणून पोलिसांकडून 100 वाहनांवर कारवाई करीत वाहने जप्त केली. यापुढे शहर अधिक कडक पावले प्रशासनाकडून उचलण्यात येणार आहेत, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे.
राजगुरूनगर शहरामध्ये लॉकडाऊन असतानाही नागरिकांनी आज (दि. 24) मोठी गर्दी केली होती. राजगुरूनगर नगर परिषदेने शहरातील सर्व रस्ते दि. 23 रोजी रात्रीपासून बंद केले आहेत. त्यामुळे केवळ वाडा रस्ता वाहतुकीसाठी खुला असल्याने आज सकाळीपासून नागरिकांनी दुचाकी, चारचाकीमधून भाजीपाला व आवश्यक वस्तू खरेदीसाठी व बॅंकेची कामे करण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
यात दुचाकीवर विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या मोठी होती. दरम्यान पोलिसांनी जुना मोटार स्टॅन्ड परिसरात नाका बंदी करून विनाकारण दुचाकीवरून फिरणाऱ्या 100 पेक्षा जास्त दुचाकी जप्त केल्या आहेत.
सुरुवातीला लॉकडाऊन काळात भाजीपाला, औषधे, किराणा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. नगर परिषदेने आवाहन केल्यानुसार घरपोच डिलिव्हरी देण्याची तयारी करीत संपूर्ण शहरात कडकडीत बंद ठेवण्यात आला होता. शहरातील रस्ते बंद करण्यात आले होते.
गर्दी कमी कमी होत गेली; मात्र मध्यंतरी कडक केलेली कारवाई काही प्रमाणात शिथिल करण्यात आल्याने नागरिक पुन्हा रस्त्यावर आले. त्यातच पुणे आणि पिंपरी चिंचवड, भोसरी परिसरात रुग्णांची संख्या वाढली आहे.
राज्यातील इतर ठिकाणीही करोनाग्रस्तांची संख्या वाढू लागल्याने खबरदारी म्हणून राजगुरूनगर शहरातील गर्दी रोखण्यासाठी नगर परिषद व पोलीस यांनी कडक भूमिका घेत शहरातील अनेक भाग बंद करून विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई सुरु केली आहे.
शहरात सर्वच वाहनांना बंदी
आज सकाळी पासून 12 वाजेपर्यंत मोठी गर्दी शहरात झाली. वाहतूक कोंडी होईर्यंत नागरिक रस्त्यावर आल्याने पोलिसांनीही कडक भूमिका घेत अनावश्यक फिरणाऱ्या नागरिकांवर व दुचाकी, चारचाकी वाहनांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. दिवसभरात 100पेक्षा जास्त वाहने जप्त केली आहेत. शुक्रवार (दि 24) पासून सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर फिरू नये. पोलिसांच्या माध्यमातून कडक कारवाई केली जात असून, संचार बंदीचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली जाणार आहे.