मांजरी – वर्षानुवर्षांच्या वाहतूक कोंडीमुळे मुंढवा- केशवनगरवासियांचे जगणे असह्य, झाले आहे. आता आमची सहनशीलता संपली आहे. मुंढवा चौकात भूयारी मार्ग अथवा उड्डाणपूल करा तसेच बाधित नागरिकांना भरपाई देऊन येथील रस्त्यांचे रुंदीकरण करा. नाहीतर मनपा आयुक्तालयात हजारो नागरिकांना घेऊन घुसू ,असा खणखणीत इशारा भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस संदीप लोणकर यांनी दिला.
महात्मा फुले चौक मुंढवा येथे रोजच्या जीवघेण्या वाहतूक कोंडीतुन सुटका होण्यासाठी भुयारी मार्ग अथवा उड्डाणपूल व्हावा तसेच केशवनगरमधील रस्त्यावरील अतिक्रमणे यामुळे अनेक चौकांमध्ये होणारी वाहतूक कोंडी,मुंढवा-केशवनगरमधील रस्ता रुंदीकरणात बाधित नागरिकांना योग्य नुकसान भरपाई मिळण्याकरिता केशवनगरचे माजी उपसरपंच व भाजपा शहर सरचिटणीस संदीप लोणकर यांच्या नेतृत्वाखाली मुंढवा चौकात भर पावसात जनआक्रोश आंदोलन करण्यात आले.
यावेळी माजी आमदार योगेश टिळेकर,भाजपा विधानसभा अध्यक्ष संदीप दळवी, महिला आघाडी अध्यक्षा स्वाती कुरणे, गणेश घुले, प्रशांत भंडारी, कुलदीप कोद्रे, अशोक येवले, देवीदास लोणकर, साहेबराव लोणकर, कर्नल सक्सेना, ओंकान्त बोने, सतीश शिरवळे, आरपीआय अध्यक्ष महादेव दंदि, अनिल आबनावें, सागर भंडारी, संतोष माने, नंदकुमार लोणकर, प्रदीप पाटील, सोमलिंग जतकर तसेच विविध सोसायट्यांचे पदाधिकारी आणि मुंढवा केशवनगर परिसरातील शेकडो नागरिक, महिला, युवक यांनी आंदोलनामध्ये आपला सहभाग नोंदवला.
महापालिका प्रशासनाचा तीव्र निषेध व्यक्त केला.पाऊस पडत असतानाही शेकडो आंदोलक उस्फुर्तपणे या आंदोलनात सहभागी झाले होते. पुणे मनपा रस्ते विभाग अभियंता ननावरे यांनी यावेळी निवेदन स्वीकारले तर आंदोलनप्रसंगी मुंढवा पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. पाच वर्ष आमदार म्हणून मुंढवा- केशवनगरसाठी मी काय काम केले हा प्रश्न नागरिकांच्या मनात आहे. महात्मा फुले चौक मुंढवा येथे भुयारी मार्ग अथवा उड्डाणपूल व्हावा यासाठी, मुंढवा-केशवनगरमधील रस्ता रुंदीकरणात बाधित नागरिकांना योग्य नुकसान भरपाई मिळून रुंदीकरणाची काम तातडीने सुरु करण्याबाबत मनपा आयुक्त यांच्याबरोबर तातडीने बैठक घेणार आहे, याबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचीही भेट घेणार असल्याचे यावेळी माजी आमदार योगेश टिळेकर यांनी सांगितले.
…..तर आयुक्तांच्या कार्यालयात घुसून आंदोलन छेडू
मुंढवा, केशवनगर येथे सातत्याने वाहतूक कोंडी होत असून यात नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. परंतु येथे नियमित होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर महापालिका किंवा पोलीस प्रशासनाकडून आतापर्यंत कोणत्याच ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे या बेजबाबदार महापालिका प्रशासनाचा निषेध करण्यासाठी पडत्या पावसातही जन आक्रोश आंदोलन करण्यात आले.आजच्या आंदोलनाची दखल घेऊन तात्काळ उपाययोजना केल्या गेल्या नाहीत.तर,मात्र आयुक्तांच्या कार्यालयात घुसून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे भाजपा पुणे शहराचे सरचिटणीस संदीप लोणकर म्हणाले.