सदाशिव पेठेत सर परशुरामभाऊ महाविद्यालयापासून (एस.पी. कॉलेज) अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावर खजिना विहीर विठ्ठल मंदिर आहे. मंदिर अगदी साधे आहे; पण जुने म्हणजे सुमारे 250 वर्षांपूर्वीचे आहे. त्यामुळे जुन्या पुण्याच्या इतिहासात या मंदिराचा समावेश होतो. सध्याचे मंदिर अलीकडच्या सुमारे 40 वर्षांपूर्वीच्या काळातील असले, तरी देखील त्याचे “स्ट्रक्चर’ पाहता फार अलीकडचे आहे असे म्हणता येत नाही.
खजिना विहीर विठ्ठल मंदिर हे पूर्वी सध्याच्या मंदिराच्या समोरच्या बाजूला होते. मात्र, रस्ता रुंदीकरणात मंदिराच्या जागेत बदल झाला. या मंदिरासाठी श्री दृष्टधुम्न खुरपे यांनी जागा दिली. त्यानंतर हे मंदिर या जागेत अस्तित्वात आले. हे मंदिर घडवताना मूळ जागेला कोठेही धक्का लावण्यात आलेला नाही आणि त्यामुळेच मंदिराचे अस्तित्व जुन्या पुण्याच्या ठेवणीकडे वळलेले दिसून येते आहे. मंदिरातील मूर्ती 250 वर्षे जुन्या आहेत. त्यांना वज्रलेप वगैरे काही केलेला नाही. या मंदिरात सातत्याने काही ना काही कार्यक्रम सुरू असतात. नित्याची पूजा, हरिपाठ, भजन-कीर्तन होते. मंदिराची दिंडी परंपरा नाही.
सात दिवस अखंड वीणावादन
सुमारे 40 वर्षांपूर्वी या मंदिराचा जीर्णोद्धार करताना मूर्ती मूळ जागेवरून हालवल्या होत्या. त्यावेळी समोर असलेल्या फडके हॉलच्या ठिकाणी मोकळी जागा होती आणि तिथे एक औदुंबराचे झाड होते. या झाडाखाली या मूर्ती सात दिवस धान्यांत ठेवलेल्या होत्या. या सात दिवसांच्या काळात या झाडाखाली अखंड वीणावादन सुरू होते. या मूर्तींची स्थापना सुरेश कासार या येथील विश्वस्तांच्या हातूनच केली आहे. सध्या मंदिर व्यवस्थाही खुरपे कुटुंब पाहतात. वारीच्या काळात येथे अकलूजची दिंडी येते. याबरोबर इतरही भाविक असतात. या सर्वांची सोय बाजूलाच असलेल्या स्काऊट ग्राऊंडवर होते आणि लालजी गुरूजी यांची एक दिंडी येते तिची पुणे विद्यार्थी गृह येथे त्यांची सोय केली जाते.
खजिना विहीर
या परिसरात दोन-तीन मिनिटांच्या अंतरावर एक विहीर होती. (सध्याच्या एसपीज् बिर्याणीच्या ठिकाणी) या विहिरीतील पाणीसाठा विपुल होता, परिसरातील नागरिक येथूनच पाणी नेत असत. या पाण्याचा साठा असलेल्या विहिरीलाच खजिना विहीर म्हटले गेले आहे.
दिंडीतील महिलाच बनवतात स्वयंपाक
स्काऊड ग्राऊंडवर उतरलेल्या दिंडी सोहळ्यातील महिला तीन वेळचा स्वयंपाक बनवतात. तिथेच चूल मांडली जाते आणि भाकरी-पिठलं-भात आणि ठेचा याबरोबर शिरा असा स्वयंपाक बनवतात. यावेळी आलेल्या भाविकांना हाच प्रसाद दिला जातो. वारी निघताना या महिलांना मंदिर विश्वस्तांकडून साडी-चोळीचा आणि पुरुषांना धोतर-टोपीचा आहेर करण्याची प्रथा आहे.
सदाशिव हौदाला “कात्रज’हून पाणी
कात्रज तलावतून पुणे शहरासाठी पाण्याची सोय पेशव्यांच्या काळात करण्यात आली होती. त्याचे बरेच स्रोत आजही पुण्यात आहेत. त्यातील एक पाण्याचा स्रोत या मंदिराजवळून जातो. दगडीने बांधलेल्या या स्रोताचा प्रवाह आजही प्रचंड मोठा आहे. येथूनच सदाशिव पेठ हौदाकडे हा स्रोत नेण्यात आला. मात्र, आता सदाशिव पेठ हौद काळाच्या उदरात गेला आहे.
गरुडाच्या प्रतिमेवरून मिरवणूक
हे मंदिर तयार झाल्यावर मंदिरात विठ्ठल-रक्मिणीच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. तत्पूर्वी मूर्तींची भव्य मिरवणूक गरुडाच्या प्रतिमेवरून काढण्यात आली होती. यावेळी पुणे वारकरी संप्रदायाचे भजनी मंडळ होते आणि नांदेड सिटीच्या पलीकडून एका गावातून ढोलपथक मागवले होते. सुमारे दोन हजारांहून अधिक लोक या मिरवणुकीत सहभागी झाले होते.