वाई – करोनाला रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून सोशल डिस्टन्सचा नियम आहे. मात्र, वाई शहरातील भाजी मंडईत व्यापाऱ्यांकडून सोशल डिस्टंन्सचा फज्जा उडवला जात आहे. मात्र, त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना सोसावा लागत आहे. वाईतील भाजी मंडईतील परिस्थिती म्हणजे “व्यापारी नियम मोडताहेत अन् नागरिक मार खाताहेत’ अशीच झाली आहे.
वाई शहरातील व्यापाऱ्यांकडून केवळ दिखाव्यापुरते दुकानाबाहेर चौकोन आखले असून कसलेही नियोजन नसल्याने दुकानांत येणाऱ्या नागरिकांना उगाच मार खावा लागत आहे. सध्या वाई शहरात भरत असलेल्या भाजी मंडईचा प्रश्न बिकट बनला असून पालिकेतील उपनगराध्यक्ष व काही सदस्य भाजी मंडई भरविण्याच्या बाजूने आहेत. तर काहींचा विरोध आहे. परंतु, भाजी मंडईतील बागवान स्वतःच्या घरातून व्यापार करीत आहेत. त्यांना काही फरक पडत नाही, ग्रामीण भागातून येणाऱ्या शेतकऱ्यांची पंचाईत होत आहे, हे पालिका अधिकाऱ्यांनी तपासून पहावे, आमदार मकरंद पाटील यांनी शेतकऱ्यांना त्रास देऊ नये, अशा सूचना पालिका मुख्याधीकाऱ्यांसह अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यामुळे सध्या सकाळी सात ते नऊ या कालावधीत शेतकऱ्यांना भाजी मंडईत बसण्याची परवानगी आहे.
घरपोच भाजीपाला, किराणा माल, दूध या सेवेचा पुरता फज्जा उडालेला आहे. वाई शहरातील पेट्रोल पंपांवर अगोदरच स्थानिकांची पेट्रोल टाकण्यासाठी गडबड असते. पेट्रोल पंपावर पोलीस चुकीच्या पद्धतीने नागरिकांची हाताळणी करीत असल्याने वादाचे प्रसंग निर्माण होत आहेत, ग्रामपंचायतीच्या पत्रावर, अत्यावश्यक सेवा कार्ड, बॅंक कर्मचारी, सेवा संस्था कार्ड यांच्यासह पोलीस शेतकऱ्यांची अडवणूक करीत असल्याच्या तक्रारी आहेत. परंतु, पेट्रोल पंप मालक योग्य भूमिका घेत त्यातून मार्ग काढताना दिसत आहेत. वाई शहरात सकाळी 9 ते 2 या दिलेल्या वेळेत नागरिक मूलभूत गरजेच्या वस्तू खरेदीसाठी बाजारपेठेत जात आहेत. मात्र व्यापाऱ्यांच्याकडून दुकानाबाहेर चौकोन आखण्याव्यतिरिक्त काहीही केले जात नाही.
ग्राहकांना नियमानुसार सेवा देण्याऐवजी रटाळवाणे काम सुरू असल्याने दुकानात येणाऱ्या ग्राहकानाच पोलिसांचा मार खावा लागत आहे. ओळीने सोशल डिस्टंन्सिंग ठेवून झटपट ग्राहकांना माल देणे अपेक्षित असते. मात्र, पोलीस आले की लाईन लावा असे आतून किराणा दुकानदार सांगताना दिसत आहे. त्यामुळे लाईनमध्ये उभ्या असलेल्या एका युवकाला पोलिसांच्या काठीचा प्रसाद खावा लागला. गेल्या दोन दिवसांत पंधरा ते वीस गाड्यांवर कारवाई करून गाड्या जप्त केल्या आहेत. तरीही हुल्लडबाजाची संख्या कमी होताना दिसत नाही, एकंदरीत वाई शहरात लॉकडाऊनमुळे शांतता आहे. परंतु, जगण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने व हातावर पोट असणारे हातावर मोजण्याइतके काही नागरिक रस्त्यावर उतरताना दिसत आहेत, याला कोणी काहीही करू शकत नाही.